पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – शहरातील जुन्या सांगवी भागात अचानकपणे अनके कावळे मरून पडत असल्याची घटना समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून हा प्रकार सुरू होता, पण गुरुवारी कावळ्यांची संख्या अचानक वाढल्यानं परिसरात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. काही दिवसांपूर्वी बर्ड फ्लूचा प्रकार राज्यात पाहायला मिळाला होता, तसा काही प्रकार आहे का? अशी चर्चा परिसरात सुरु आहे.
जुन्या सांगवीतील अहिल्यादेवी होळकर घाट आणि त्या बाजूला असलेल्या वेताळ महाराज उद्यानात गेल्या काही दिवसांपासून कावळे मरून पडत असल्याचं पाहायला मिळालं. नागरिकांच्या लक्षात हा प्रकार आला होता. मात्र त्याकडं फारसं कोणी लक्ष दिलं नाही. पण गुरुवारी याठिकाणी मरून पडणाऱ्या कावळ्यांची संख्या जास्त असल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळं नागरिकांमध्ये काहीशी भीती पसरली आहे. विशेष म्हणजे मृत कावळयांच्या शरीरावर कुठलीही जखम नाही किंवा त्यांना विजेचा धक्का लागल्याचंही दिसत नाही. त्यामुळं कावळे कशामुळं मरतायत असा प्रश्न स्थानिकांना पडलाय.
गुरुवारी सकाळी याठिकाणी मोठ्या संख्येनं कावळे मरून पडलेले आढळून आले. त्यावेळी परिसरातील तरुणांनी संबंधित यंत्रणांना याची माहिती दिली. मात्र फारसा प्रतिसाद मिळला नाही. कावळ्यांचा मृत्यू कशामुळं अशाप्रकारे होतोय, एखाद्या आजारामुळं त्यांचा मृत्यू होतोय का? अशी भीती नागरिकांना आहे. तसंच मृत कावळ्यांमुळं परिसरात आणखी एखाद्या आजाराचा संसर्ग पसरण्याची शक्यताही नाकारता येत नसल्यानं नागरिक यावर चिंता व्यक्त करत आहेत.






