देहराडून (उत्तराखंड) – चमोली जिल्ह्यात मलारी- सुमना भागात हिमकडा कोसळून ८ जणांचा मृत्यू झाला. तर ६ जणांची प्रकृती गंभीर आहे. यात अडकलेल्या ३८४ लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. ही घटना भारत- चीनच्या सीमेला लागून असलेल्या जोशीमठ सेक्टरमधील सुमना भागात घडली.
चमोली येथील भारत-चीन सीमेला जोडणाऱ्या रस्त्याजवळ मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी झाली आहे. यामुळे हिमस्खलन झाले. याबाबत भारतीय सैन्याच्या सेंट्रल कमांड यांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉर्डर रोड ऑर्गनायजेशनचा (बीआरओ) एक कॅम्प बर्फाच्या जोरदार वादळात अडकला होता. यामुळे बीआरओचे काम पाहणारे अनेकजण अडकून पडले होते. यातील ३८४ जणांना वाचवण्यात आले आहे. तर ८ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. सहाजणांची प्रकृती गंभीर आहे.
मलारी- सुमना भागाला शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता हिमस्खलन झाले. या भागात गेल्या पाच दिवसांपासून जोरदार हिमवृष्टी सुरु आहे. दरम्यान, उत्तराखंड स्पेस ॲप्लिकेशन सेंटरचे (यूएसएसी) संचालक एमपीएस बिष्ट यांनी, अतिवृष्टीमुळे हिमस्खलन झाल्याचे म्हटले आहे. दरम्यान, उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी हिमस्खलन झालेल्या भागाची हवाई पाहणी केली.






