औरंगाबादमध्ये दोन कारची समोरासमोर धडक; तीन ठार, दोन गंभीर

औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) – खुलताबादहून औरंगाबाद शहराच्या दिशेने येणाऱ्या कारला समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले असून दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात शनिवारी रात्री साडे अकराच्या सुमारास दौलताबाद किल्ल्याच्या समोरच घडला.

ऐतिहासिक दौलताबाद किल्ला येथे भरधाव वेगाने जाणारी फॉर्च्युनर क्रमांक एमएच २० सीएस ५४६२ आणि स्विफ्ट कार क्र. एमएच-२०-डीजे -१७७१ या दोन कारचा भीषण अपघात घडला. अपघातात गल्लेबोरगाव येथील राजू आसाराम (४३), दीपक खोसरे (४९) आणि मुकुंदवाडी येथील मदन अशोक जगताप (२८) या तिघांचा जागीच मृत्यू झाला तर कसाब खेडा येथील सुनील कृष्णा आवटे (४३) आणि खुलताबाद येथील राजू रंगनाथ वरकड (४०) हे गंभीर जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच दौलताबाद पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक बचाटे, सहाय्यक फौजदार कांबळे, सचिन त्रिभुवन आणि होमगार्ड नईम यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून तिघांना मयत घोषित केले तर जखमींवर घाटीत उपचार सुरू आहेत. याप्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here