रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना अटक

औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) – राज्यात सध्या लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. परराज्यातील अनेक जण आता आपल्या गावाकडे निघाले आहेत. परराज्यात जाणाऱ्या प्रवाशांसाठी तत्काळमध्ये रेल्वे तिकीट काढून त्याचा काळा बाजार करणाऱ्या दोन जणांना रेल्वे सुरक्षा दलाने ताब्यात घेतले. कल्पेश सखाराम माळी (३७, रा. शिर्डी), छगन खैरू राठोड (४१, रा. पदमपूरा) या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. छगन खैरू राठोड हा रेलवे विभागाला संगणक तज्ज्ञ पुरविणाऱ्या संस्थेमध्ये काम करीत असल्याची माहिती समोर आली आहे.

रेल्वे सुरक्षा दलाचे निरिक्षक अरविंद शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, कन्नड येथील एका टपाल कार्यालयामधील रेल्वे तिकीट केंद्रात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. त्याआधारे उपनिरीक्षक के. चंदूलाल, सहाय्यक निरीक्षक विजय वाघ यांच्यासह आरपीएफ कर्मचारी यू. आर. डोभाल, हनुमान मीना आणि सूरज बाली यांनी सापळा रचून शनिवारी सकाळी साडेअकराला तिकीटाचा काळाबाजार करीत असताना, माळी आणि राठोड या दोघांना अटक करण्यात आले. दोघांच्या ताब्यातून दोन वातानुकूलित आणि दोन स्लीपरची तिकिटे जप्त करण्यात आली. चार तिकीटांवर एकूण १२ रेल्वे प्रवाशांसाठी ११ हजार ६६० रूपये जप्त करण्यात आले आहे. या दोघांना अटक करण्यासाठी रेल्वे पोलिस बलाचे पथक तीन दिवसांपासून प्रयत्नात होते. दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई किंवा नाशिक तसेच अन्य भागातून उत्तर प्रदेश, बिहार किंवा अन्य राज्यात जाणाऱ्या प्रवाशांशी काळाबाजार करणारे संपर्क साधून त्यांच्याकडून तिकीट खरेदी करण्यासाठी आवश्यक माहिती घेऊन, ती माहिती भरून कन्फर्म तिकीट काढून देत होते. एका रेल्वेच्या तिकिटावर असलेल्या प्रती प्रवासी सहाशे ते एक हजार रूपये अतिरिक्त कमाई या काळाबाजार करणाऱ्यांकडून केली जात होती.

तत्काळ तिकीट काढण्यासाठी पीआरएस सेंटरला लिंक पाठविली जाते. ती रेल्वे विभागाच्या संबंधित असलेल्या संगणक विभागात काम करणाऱ्या छगन राठोडला मिळत होती. या लिंकवरून निर्मनुष्य किंवा जास्त गर्दी नसलेल्या रेल्वे तिकिट विक्री केंद्रावर कन्फर्म तिकिट काढले जात होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here