लोककवी हरेंद्र जाधव काळाच्या पडद्याआड

मुंबई (प्रतिनिधी चेतन किर्दत) – लोककवी हरेंद्र जाधव यांचं रविवारी पहाटे वृद्धपकाळानं निधन झालं. भिमगीतं, भक्तीगीतं, भावगीतं, कोळीगीतं, लग्नातली गाणी, लावण्या, पोवाडे, लोकनाटय, कथा असं चौफर लिखाण त्यांनी केलं होतं. सानपाडा सेक्टर-3 येथील निवास्थानी त्यांनी 88 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. जाधव यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीशी संबंधितांकडून तसेच सानपाडा परिसरात शोक व्यक्त करण्यात येत आहे.

तूच सुखकर्ता तूच दु:खहर्ता अवघ्या दिनांच्या नाथा, बाप्पा मोरया रे चरणी ठेवितो माथा हे बाप्पाचं गाण दरवर्षी गणशोत्सवात प्रत्येक मंडळात वाजतं. शिवाय आता तरी देवा मला पावशील का? सुख ज्याला म्हणत्यात ते दावशील का?, मंगळवेढे भूमी संताची, ही लोककवी हरेंद्र जाधव यांनी रचलेली भक्तीगीतं आजही प्रत्येकाच्या ओठांवर आहेत. हरेंद्र जाधव यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर व भगवान बुद्ध यांच्या जीवनावर आधारितही अनेक गीतं रचलेली आहेत, त्यातील पाहा पाहा मंजुळा हा माझ्या भिमरायाचा मळा, हे खरचं आहे खरं, श्री भिमराव रामजी आंबेडकर, ही त्यांची शाहीर विठ्ठल उमपांनी गायलेली गीतं आजही आवडीनं गायली जातात. तसंच अनेक भिमगीतं आंबेडकरी चळवळीला आजही मार्गदर्शक ठरतात. लावणी सारखं काव्यही त्यांनी हाताळलं. त्यापैकीच माझ्या नवऱ्यानं सोडलीया दारु बाय देव पावलाय गो, डोलकरा माझे डोलकरा, अशी कोळीगीतंही गाजलेली आहेत.

जाधव यांच्या 600 पेक्षाही अधिक ध्वनिफिती बाजारात आलेल्या असुन त्यांनी लिहीलेल्या गीताची संख्या दहा हजाराच्या घरात आहे. त्यांची गीते, गायक अजित कडकडे, विठ्ठल भेडे, सुरेश वाडकर, प्रल्हाद शिंदे, आनंद शिंदे, शाहीर कृष्णा शिंदे, शाहीर साबळे, कृष्णा शिंदे, किसन खरात, दत्ता जाधव, शाहीर विठ्ठल उमप अशा नामवंत गायकांनी गायली आहेत. त्यांनी साक्षरता, अंधश्रद्धा निर्मुलन, एड्स, दारूबंदी यावर आधारित अनेक लोकनाटय, आकाशवाणी व दुरदर्शनवर प्रसारित करुन समाजप्रबोधनात्मक लिखाण केलं आहे. लिखानातून फुले, शाहू, आंबेडकरांची परिवर्तनावादी क्रांतीवादी चळवळ समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम ज्यांनी केलं त्यात जाधव यांचं नाव प्रामुख्यानं घेतलं जातं.

साहित्य सेवेतून लोकरंजनाद्वारे समाजप्रबोधन करण्यावर त्यांनी कायम भर दिला. आयुष्यातली 50 दशकाहुन अधिक काळ त्यांनी साहित्य क्षेत्रात लोकरंजनातून समाज प्रबोधनासाठी दिलेला आहे. मात्र शासनाकडून त्यांच्या कार्याची दखल घेतली नसल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या पश्चात त्यांची मुलगी तारका जाधव, पत्नी, जावई व नात असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here