मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – राज्याला कोरोनाने विळखा घातला आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेन म्हणत लॉकडाऊन लावण्यात आला आहे. परंतु, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अजूनही आटोक्यात आलेली नाही. त्यामुळे आणखी 15 दिवसांचा लॉकडाऊन लागू करावा, अशी मागणीच मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत केली आहे.
राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू आहे. यावेळी कोरोनाची परिस्थिती, लसीकरण आदी मुद्यांवर चर्चा होत आहे. लॉकडाऊन लावल्यामुळे काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही आटोक्यात येत आहे. त्यामुळे या परिस्थितीवर जर मात करायची असेल तर आणखी 15 दिवसांचा लॉकडाऊन वाढवावा, अशी मागणी अनेक मंत्र्यांनी केली आहे.
तर, लॉकडाऊनमुळे रुग्णसंख्या कमी झाली. लॉकडाऊन वाढवला गेला पाहिजे. माझी वैयक्तिक भूमिका आहे. राज्य मंत्रिमंडळ यावर अंतिम निर्णय घेईल, अशी भावना छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.
तसंच, राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत दिले होते. ‘कोरोना बाधितांची संख्या मुंबईत कमी होत आहे. पण राज्यातील इतर शहरांत अद्याप कोरोना बाधितांची संख्या जास्त आहे. यामुळे सध्याच्या लॉकडाऊन कालवाधी पुन्हा वाढवण्यात येईल, असं विजय वडेट्टीवार म्हणाले होते.






