अलिबाग सोगावकर – रायगड व परिसरात निसर्ग वादळामुळे खूप नुकसान झाले आहे. यामुळे परिसरातील शेतकरी तसेच सामान्य 
नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यांच्या नुकसानाचे पंचनामे होवून आता दोन महिने उलटले आहेत, तरी त्यांना नुकसानभरपाई मिळाली नाही. तशातच कोरोना टाळेबंदीमुळे या वादळग्रस्तांवर आधीच दुष्काळ त्यात तेरावा महिना अशी परिस्थिती ओढवली आहे. अखेरीस मनोज रोटकर या वादळग्रस्ताने थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनाच पत्र लिहून आपली कैफियत मांडत त्यांच्याकडे दाद मागितली आहे.
आपल्या या पत्रात मनोज रोटकर लिहितात की, मा. मुख्यमंत्री महोदय मी मनोज प्रभाकर रोटकर वआपणांस विनंती अर्ज करीत आहे , साहेब जगात कोरोनाचे मोठे संकट असल्यामुळे माझ्या सारखे बरेचसे लोक कामधंदा नसल्यामुळे आर्थिक दृष्ट्या पूर्णपणे खचून गेले आहेत त्यात आम्ही मध्यमवर्गातील आसल्यामूळे गरज असतानाही कोणाकडून कसलीच प्रकारची मदत घेता येत नाही। आणि ती कोणी देतही नाही त्यामुळे जगण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे, आसे सूरू असताना दि. ३/६/२०२० रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळात माझे व माझ्या सारख्या बर्याच लोकांचे खूप मोठे नुकसान झाले आहे माझे घराचे संपूर्ण छत निसर्ग चक्रीवादळात वादळात ऊडून गेले आहे व साठवलेले संपूर्ण घरातील अन्नधान्य व इलेक्ट्रॉनिक उपकरणे यांचे नुकसान मोठे प्रमाणात झाले आहे नुकसानीची
पाहणी रेवदंडा ग्रामपंचायतीने केली होती व शासनाची मदत मिळणार आसे आश्वासनही दिले होते व त्या साठी पंचायतीचे कर्मचारी यानी आधार कार्ड क्रमांक व बैंक खाते क्रमांक ही घेतला होता, नंतर आपण दौरा करून अलिबाग तालुक्यातील गावांची पाहणी करून तातडीने नुकसानग्रस्त लोकांना मदत जाहीर केली होती, परंतू आज चक्रीवादळ होऊन दोन महीने व्हायला येतील तरीही मला व माझ्या सारख्या बर्याच लोकांना कोणतीही सरकारी मदत मिळाली नाही त्यामुळे खायचे काय आणी रहायचे कसे हा गंभीर प्रश्न मला पडला आहे ,जगण्यापेक्षा मरणाचा मार्ग सोपा वाटू लागला आहे, आसे असताना त्यातच, बँकवाले, फायनान्स वाले, सावकार, हे लोक फोन करून व नोटीस पाठवून मानसिक त्रास ही देत आहेत तरी साहेब कृपा करून माझ्या आर्जाची गांभीर्याने दखल घेऊन निसर्ग वादळाची आपण जाहीर केलेली आर्थिक मदत मला व माझ्या सारख्या खरोखरच नुकसान झालेल्या लोकांना आपण लवकरच मिळवून देऊन आम्हाला या आर्थिक संकटातून बाहेर काढून आपण दिलेला शब्द पूर्ण कराल अशी मी आशा करतो सदर अर्जास, माझे ,आधार कार्ड,बेंक खाते नं ची झेरॉक्स, नुकसान झाल्याचे ग्राम पंचायतचे पत्र, व घराच्या नुकसानाचे फोटो जोडले आहेत.
हे मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र त्यांनी प्रसिध्दी माध्यमांनाही दिले असल्याने, याविषयीची चर्चा परिसरातील नागरिकात चांगलीच गाजत असून, मनोज रोटकर यांनी या विषयाला वाचा फोडल्याबदद्ल त्यांचे अभिनंदनही करण्यात येत आहे.







