रेल्वेतून गांजाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक

मुंबई (प्रतिनिधी चेतन किर्दत) – प्रवासावर निर्बंध असताना रेल्वेगाड्यांमधून गांजाची तस्करी करणाऱ्यांना रेल्वे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा दलाने संयुक्त कारवाई करीत बेड्या ठोकल्या आहेत. मोहम्मद नदाफ आणि शंकर पाल अशी या आरोपींची नावे आहेत. या आरोपींकडून ८ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. त्याची किंमत ८० हजार रुपये आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये येणाऱ्या कोणार्क एक्सप्रेसमध्ये गांजाची तस्करी होत असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली. या माहितीच्या आधारे या एक्स्प्रेसमधून येणाऱ्या प्रवाशांच्या हालचालींवर रेल्वे पोलिसांकडून बारीक लक्ष ठेवण्यात आले. या वेळी दोन तरुण संशयास्पद हालचाली करताना आढळले. या तरुणांचा पाठलाग करत पोलिसांनी दुकलीला ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी आधी उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने गांजाची तस्करी करीत असल्याची कबुली दिली. त्यांच्याकडील दोन बॅगांतून ८ किलो गांजा जप्त करण्यात आला असून याची किंमत ८० हजार रुपये आहे, अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.

आरोपी मोहम्मद नदाफ आणि शंकर पाल हे दोघे सीएसएमटी स्थानकाच्या बाहेरील फूटपाथवर राहत आहेत. मूळचे बिहारमधील असलेले हे दोघे काम मिळवण्यासाठी मुंबईत आले होते. यापूर्वीदेखील त्यांनी रेल्वेगाड्यांतून अंमली पदार्थांची तस्करी केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यांनी ८ किलो गांजा कोठून आणला? मुंबईत तो कोणाला विकणार होते? गांजा तस्करीत आणखी कोण कोण सहभागी आहेत? ही माहिती जाणून घेण्यासाठी सीएसएमटी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक ए. के. पाडेकर तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here