बंगालमध्ये हिंसा : ममता बॅनर्जी आज तिसऱ्यांदा घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

कोलकाता – विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये हिंसेला तोंड फुटलं आहे. आज ममता बॅनर्जी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान त्यांनी असा आरोप केला आहे की भाजपला पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करायची आहे.

दरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी राज्यपाल जगदीप धनखर यांच्याशी फोनवरून या हिंसाचाराच्या संदर्भात चर्चा केली. बंगालमध्ये राजकीय हिंसा वाढल्याच्या प्रकारासंदर्भात त्यानी निराशा व्यक्त केली आहे. दरम्यान बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारामध्ये 12 कार्यकर्त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. पीएम नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात राज्यपाल धनखरं यांच्याशी फोनवरून केलेल्या चर्चेत चिंता व्यक्त केली आहे. राज्यपालांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे.

राज्यपालांनी आणखी एक ट्वीट करत असं म्हटलं आहे की, ‘पश्चिम बंगाल पोलिसांनी लोकशाहीसाठी लाजिरवाणी असणारी राजकीय हिंसा, तोडफोड, जाळपोळ, भय हे थांबवायला हवं. निवडणुकीनंतरच बंगालमध्ये हिंसा का होते? लोकशाहीवर हल्ला का होत आहे? धनखड म्हणाले की ‘भीतीदायक बातम्या मिळत आहेत, लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळत आहेत.’

त्याचवेळी काळजीवाहू मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, शपथ घेतल्यानंतर त्या या विषयाला सामोऱ्या जातील. मात्र राज्यात भाजपला राष्ट्रपती लागवट लागू करायची आहे, असा आरोप त्यांनी भाजपवर केला. विधानसभा निवडणुकीनंतर भाजप जातीय हिंसाचाराला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप ममता यांनी केला.

दरम्यान ममता बॅनर्जींच्या कालीघाट निवासस्थानी वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांसह बैठक घेतली. यामध्ये एकंदरित बंगालमधील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. दरम्यान या हिंसाचारास टीएमसी आणि त्यांचे कार्यकर्तेच जबाबदार असल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here