गृह राज्यमंत्री शंभुराज देसाईंच्या घरासमोर अज्ञातानं केली जाळपोळ

सातारा (प्रतिनिधी दिनेश लोंढे) – राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्या बंगल्यासमोर अज्ञात व्यक्तींनी शेणाच्या गोवऱ्या पेटवल्याचा प्रकार घडला आहे. कारमधून आलेल्या व्यक्तीनं शेणाच्या गोवऱ्या पेटवल्या आणि तो फरार झाला अशी माहिती मिळत आहे. हा प्रकार का घडला याचं स्पष्ट कारण अद्यार समोर आलेलं नाही. मराठा आरक्षण रद्द झाल्याच्या रागातून हा प्रकार घडल्याची चर्चा आहे.

गुरुवारी साताऱ्यामध्ये राज्याचे गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्या घरासमोर एक विचित्र प्रकार घडल्याचं पाहायला मिळालं. कारमधून आलेल्या काही लोकांनी देसाई यांच्या बंगल्यासमोर शेणाच्या काही गोवऱ्या जाळल्या आणि लगेचच तिथून फरार झाले. अज्ञात लोकांनी हा प्रकार केला. त्यानंतर ते लगेचच पळून गेले. शेणाच्या गोवऱ्यांनी काही वेळातच आग पकडली. पण हा प्रकार लोकांच्या लक्षात आल्याने त्यांनी यावर पाणी टाकत ही आग वाढू दिली नाही. ज्याठिकाणी या गोवऱ्या जाळण्यात आल्या होत्या, त्याच्या आसपास काही कार उभ्या होत्या. त्यामुळं ही आग जर पूर्ण भडकली असती तर मोठा अनर्थ घडू शकला असता.

या प्रकारानंतर पोलिस हे कृत्य करणाऱ्यांचा शोध घेत आहेत. हे असे का घडले किंवा करणाऱ्यानं असं का केलं यामागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र तसं असलं तरी, मराठा आरक्षण रद्द झाल्याचा राग हे यामागचं कारण असू शकतं अशी चर्चा आहे. आरक्षण रद्द झाल्यानंतर त्याचा राग व्यक्त करण्यासाठी अशा प्रकारे निषेध करण्याचा प्रयत्न केला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सुप्रीम कोर्टानं बुधवारी मराठा आरक्षण रद्द करत मराठा समाजाला धक्का दिला आहे. राज्य सरकारनं जाहीर केलेलं आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकलं नाही. यावरून राज्य सरकारवर विरोधकही आरोप करत आहेत. राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टात योग्य पद्धतीनं बाजू न मांडल्याचा आरोपही केला जात आहे. त्यात आता साताऱ्यातील या प्रकारानंतर खरंच हे आरक्षणाच्या मुद्दयावरून घडलं असेल, तर वाद अधिक चिघळण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here