ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – मोरीवली एमआयडीसी क्षेत्रात एका रासायनिक कंपनीला भीषण आग लागली. या कंपनीत रयायनांचा मोठा साठा असल्याने आजूबाजूच्या गावांमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. एमआयडीसीतील एका कंपनीला ही आग लागली. आग लागण्यापूर्वी या कंपनीत वायुगळती सुरू झाल्याचे वृत्त आहे.
कंपनीत वायू गळती होत असल्याचे लक्षात आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला माहिती दिली. मात्र दरम्याच्या काळात कंपनीतील रसायनांनी पेट घेतला आणि आग भडकली.
कंपनीत रसायनांचा साठा असल्याने या आगीमुळे मोठा धोका निर्माण झाला होता. घटनास्थळी अंबरनाथ महापालिकेचे अग्निशमन दल, एमआयडीसीचे अग्निशमन दल आणि उल्हासनगरचे अग्निशमन दल पोहोचले. कंपनीत रसायनांचा साठा असल्याचे लक्षात घेत अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनी या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला. रसायनांनी पेट घेतल्याने आजूबाजूच्या परिसरात प्रदूषण पसरले. यामुळे परिसरातील नागरिकांना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. यावर उपाय म्हणून नागरिकांनी घराच्या दारे खिडक्या बंद करून घेतल्या.






