जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील अंचलवाडी येथे वादळामुळे खळ्यातील झोपडीवर चिंचेचा वृक्ष कोसळून दोघरा सख्ख्या बहिणींचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज रविवारी दुपारी सव्वातीन वाजता घडली. ज्योती बल्लू बारेला (वय १६) आणि रोशनी बल्लू बारेला (वय १०) अशी या घटनेत मृत्यू झालेल्या बहिणींची नावे आहेत.
ज्योती आणि रोशनी यांचे वडील बल्लू बारेला हे अमळनेर तालुक्यातील रणाईचे गावातील रहिवासी राजेंद्र भीमराव पाटील यांच्या शेतात सालदारकी करतात. बल्लू यांनी राहण्यासाठी अंचलवाडी गावाबाहेर खळ्यात चिंचेच्या झाडाजवळ झोपडी बांधलेली होती. रविवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अचानक जोरात वादळ-वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. याचवेळी काही कळण्याच्या आत खळ्यात असलेले चिंचेचे झाड झोपडीवर कोसळले. त्यात ज्योती बारेला आणि रोशनी बारेला या दोन्ही बहिणी झाडाखाली दाबल्या जाऊन त्यांचा मृत्यू झाला.
ही घटना घडली तेव्हा बारेला दाम्पत्य हे दररोजप्रमाणे शेतात कामाला गेलेले होते. ज्योती आणि तिची लहान बहीण रोशनी घरी होत्या. चिंचेचे झाड झोपडीवर कोसळल्याने दोघींचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत संपूर्ण झोपडी दाबली जाऊन झोपडीतील सामानाचे नुकसान झाले आहे. दरम्यान घटनेनतंर बारेला दाम्पत्याने हृदय हेलावणारा अक्रोश केला.या घटनेनंतर गावातील सरपंच भगवान पाटील, रंगराव पाटील, गोपाळ पाटील यांच्यासह इतर ग्रामस्थ व तरुण मदतीला धावून आले. झाडाखाली संपूर्ण झोपडी दाबली गेल्याने झाड कापून मुलींचे मृतदेह व सामान बाहेर काढण्यात आले.






