चेन्नई – देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना देशभरातून आदरांजली वाहिली जात आहे. मात्र, राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना एक पत्र लिहून राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांची शिक्षा माफ करावी, अशी मागणी केली आहे.
राजीव गांधी यांच्या हत्याप्रकरणातील सात आरोपींची जन्मठेपेची शिक्षा माफ करावी व त्यांच्या सुटका केली जावी, अशी मागणी करणारे पत्र तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना लिहिले आहे. तसेच तामिळनाडूतील बहुतांश राजकीय पक्ष हीच मागणी करत असल्याचा दावाही स्टॅलिन यांनी केला आहे.
राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या शिफारसीचा स्वीकार करावा आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणातील सर्व सात आरोपींची जन्मठेपेची शिक्षा माफ करण्याचा आणि त्यांच्या तत्काळ सुटकेसाठी आदेश द्यावा, असे स्टॅलिन यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. तसेच तामिळनाडूमधील बहुतांश राजकीय पक्षही सर्व सात आरोपींच्या तत्काळ सुटकेची मागणी करत आहेत. एवढंच नाही, तर तामिळनाडूच्या जनतेचीही अशीच इच्छा आहे. या सात जणांनी मागील तीन दशकात बऱ्याच यातना सहन केल्या आहेत, असेही या पत्रात म्हटले आहे.
राजीव गांधी यांच्या हत्येच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आरोपी ए.जी.पेरारीवल याची काल ३० दिवसांसाठीची सुट्टी मंजूर करण्यात आली आहे. या आरोपीच्या आईच्या विनंतीवरुन तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांनी ही सुट्टी मंजूर केली आहे. नलिनी श्रीहरन, मुरुगन, संथन, एजी पेरारीवलन, जयकुमार, रॉबर्ट पायस आणि पी. रविचंद्रन हे सात जण राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषी आहेत.
दरम्यान, आरोपी पेरारीवलन याच्या आईने सध्याच्या करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांना पत्र लिहित ही सुट्टी मंजूर करण्याची विनंती केली होती. पेरारीवलन करोनाचा सर्वात जास्त धोका असणाऱ्यांच्या गटात मोडत असल्याचं कारागृहातल्या डॉक्टरांनी सांगितलं होतं. तर पेरारीवलनचे उपचार अद्यापही पूर्ण झाले नसल्याने त्याला उपचाराची गरज असल्याच्या कारणावरुन त्याच्या आईने या सुट्टीची मागणी केली होती.






