कोरोना काळात अंबरनाथ तालुक्यात खुलेआम बैलगाड्यांच्या शर्यत

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता 31 मे पर्यंत राज्यात कडक निर्बंध सुरू आहेत, यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद आहेत. किराणा, भाजीपाला यांना सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत दुकान सुरू ठेवण्याची मुभा आहे तर सार्वजनिक, राजकीय आणि धार्मिक कार्यक्रमांवर पूर्णपणे बंदी आहे, असं असताना कोरोनाच्या या कडक निर्बध आणि बैलगाड्यांच्या शर्यतींवर शासनाची बंदी असतानाही अंबरनाथ तालुक्यात मात्र खुलेआमपणे बैलगाड्यांच्या शर्यती सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. अंबरनाथ तालुक्यातील उसाटणे गावात बैलगाडी शर्यती झाल्याचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

मात्र पोलिसांकडे मात्र याबाबत कुठलीच माहिती नाही. शासनाने या शर्यतींवर बंदी घातलेली असतानाही या शर्यती आयोजित होतातच कशा आणि कुणाच्या आशीर्वादानं? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. दरवेळी व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून कारवाई केली जाते. यावेळी देखील तसेच केले जाईल. दरम्यान या बैलगाडी शर्यतीमधील व्हायरल झालेला व्हिडिओ पाहिला तर शेकडोंच्या संख्येने इथे गर्दी जमलेली पाहायला मिळते आहे. याठिकाणी साहजिकच सोशल डिस्टंसिंग याचा पुरता फज्जा उडाल्याचे दिसत आहे. त्यामुळे निर्माण कोरोना काळामध्ये अशा शर्यती कशा भरवल्या जातात याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

कोरोनाचे कडक निर्बंध राज्यात सुरू असताना महत्त्वाचे रस्ते, चौक या ठिकाणी पोलिसांची नाकाबंदी आहे. असे असताना तालुक्यातील विविध ठिकाणाहून या बैलजोड्या शर्यतीसाठी ऊसाटणे गावात दाखल कशा झाल्या, पोलिसांची त्यावर नजर पडली नाही का? अशी अनेक विविध प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. आता या शर्यती नंतर पोलिसांकडून गुन्हा दाखल केला जाईल. मात्र या गर्दीत कोरोनाचा विस्फोट होऊन संसर्ग वाढला तर त्याची जबाबदारी कोणाची असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here