शेतकऱ्यांनी बंधार्‍यात साठवलेल्या प्रत्येक थेंबाचा उपयोग करा

पालकमंत्र्यांचे प्रतिपादन; सोनवद येथे बंधार्‍याचे भूमिपुजन

धरणगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – शेतकर्‍यांना सिंचनासाठी तर प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी पाणी आवश्यक आहे. यामुळे अंजनी नदीवर बांधण्यात येणार्‍या बंधार्‍यातील साठवलेल्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा योग्य उपयोग करा असे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. तालुक्यातील सोनवद बुद्रुक येथे बंधार्‍याच्या भूमिपुजनाप्रसंगी ते बोलत होते.

याबाबत वृत्त असे की, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांनी धरणगाव तालुक्यात बंधार्‍यांना मंजुरी मिळाली आहे. काही दिवसांपुर्वीच बोरखेडा येथे मृदू व जलसंधारण खात्याच्या माध्यमातून १ कोटी १३ लक्ष रूपयांच्या २ बंधार्‍यांचे भूमिपुजन करण्यात आले. यानंतर आज सोनवद बुद्रुक येथे अंजनी नदीवर ७२ लाख रूपये खर्चून बंधारा बांधण्यात येत असून पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते याच्या कामाला प्रारंभ करण्यात आला. या बंधार्‍याचा परिसरातील शेतीला लाभ होणार आहे. याच्या माध्यमातून परिसरातील विहरींची जलपातळी उंचावण्यात मदत होणार असून शेतकरी थेट यातून पाणी वापरू शकतील.

आज या बंधार्‍याच्या कामाचे भूमिपुजन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी गुलाबराव पाटील म्हणाले की, या आधी अंजनी नदीवर अनेक बंधारे बांधण्यात आले असून याचा त्या-त्या परिसरातील ग्रामस्थांना लाभ झाला आहे. आता सोनवद बुद्रुक येथे बंधारा बांधण्यात येत असून याचा परिसरातील नागरिकांना लाभ होणार आहे. मात्र या बंधार्‍यामुळे पाणी उपलब्ध होणार असले तरी याचा जपून वापर करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन पालकमंत्र्यांनी केले. या बंधार्‍याच्या माध्यमातून परिसरातील भूमिगत जलसाठ्याची पातळी उंचाण्यासह सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी आपले प्राधान्य राहणार असल्याने ना. गुलाबराव पाटील यांनी नमूद केले.

या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी तालुका प्रमुख गजानन पाटील, सरपंच आशाताई उज्वल पाटील, दिलीप धनगर, धिरज पाटील, गुलाब पाटील, नारायण देवरे, दामुआण्णा पाटील, डी.ओ. पाटील, प्रेमराज पाटील, बबलू पाटील, बाळू पाटील, रवी चव्हाण सर, नारायण पाटील, चादुशेठ भाटिया ठेकेदार प्रशांत बिचवे,तुकाराम नाना पाटील, पवन पाटील , गजानन पाटील यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर भाटिया यांनी केले तर आभार उज्वल पाटील यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here