मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू समजले जाणारे महाराष्ट्राचे परिवहनमंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अनिल परब हे बढती देण्यासाठी पैसे घेतात अशी तक्रार परिवहन खात्यातील अधिकाऱ्याने नाशिकमधील पंचवटी पोलीस ठाण्यात केली आहे. या संदर्भात मनसेच्या संदीप देशपांडे यांनी एक ट्वीट केले आहे.
परिवहन मंत्री अनिल परब आणि आरटीओमधील वरिष्ठ अधिकाऱ्याविरोधात नाशिकमधील पंचवटी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. निलंबित आरटीओ निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी ही तक्रार दाखल केली आहे. आरटीओ खात्यात पदोन्नती अर्थात बढतीसाठी आणि इतर व्यवहारात भ्रष्टाचार होतो, असा आरोप त्यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. अधिकाऱ्यांच्या मदतीने ३०० कोटी रुपयांचा ट्रान्सफर पोस्टिंग घोटाळा केल्याचे या तक्रारीत नमूद आहे. पोलिसांनी तक्रार नोंदविल्यानंतर चौकशी सुरू केली आहे.
१०० कोटी महावसूली आता ३०० कोटीवर ? परिवहन मंत्री परब यांच्या विभागाचे अधिकारी पाटील यांची नाशिक पंचवटी पोलिस स्टेशनात तक्रार, गृहमंत्री वळसे पाटील किमान निष्पक्ष चौकशी करणार का????
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) May 29, 2021
याआधी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी महाराष्ट्राच्या तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप पत्राद्वारे केला होता. या प्रकरणाची चौकशी सुरू झाल्यानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. आता महाराष्ट्राच्या परिवहनमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप झाला आहे.




