मुंबई (हितेश मिस्त्री) – बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सध्या नानावटी रुग्णालयात उपचार घेत आहेत. करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे ११ जुलै रोजी त्यांना रुग्णालयात दाखल केलं होतं. गेले १७ दिवस ते रुग्णालयात आहेत. या काळात आलेले विविध अनुभव त्यांनी एका ब्लॉगच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना सांगितले आहेत. आपली मानसिक स्थिती ठिक नसून वडिलांची खूप आठवण येत असल्याचं त्यांनी या ब्लॉगमध्ये म्हटलं आहे.
बिग बींनी शनिवारी रात्री हा ब्लॉग लिहिला आहे. “करोना हा एक असा आजार आहे जो तुमच्या मानसिक स्थितीवर हल्ला करतो. मानवाला आपल्या कुटुंबियांपासून दूर करतो. करोनाची लागण झालेल्या रुग्णांना एका वेगळ्या खोलीत ठेवलं जातं. जिथे कित्येक आठवडे त्याला माणसं दिसत नाही. डॉक्टर्स येतात, तपासतात, औषध देतात पण पीपीई किट्स घातल्यामुळे त्यांचे चेहरे दिसत नाही. ते यंत्रमानव असल्याचा भास होतो. करोनाचा उपचार घेत असताना एक टप्पा असा येतो जेव्हा तुम्ही शारिरीकरित्या बरे होत असता पण एकटेपणामुळे तुम्ही मानसिक स्थिती खालावत जाते. मी देखील सध्या या स्थितीचा अनुभव घेत आहे. रात्री थंडीमुळे हात थरथरतात. झोपण्याचा प्रयत्न करतो पण झोप येत नाही. या एकटेपणामध्ये मला माझ्या वडिलांची खूप आठवण येते. मग मी त्यांच्या कविता वाचून मायेची उब अनुभवतो.” अशा आशयाचा अनुभव बिग बिंनी या ब्लॉगमधून शेअर केला आहे.







