ऑनर किलिंगच्या घटनेनं महाराष्ट्र पुन्हा हादरला; यवतमाळ जिल्ह्यात २२ वर्षीय तरुणाची हत्या

यवतमाळ (क्राइम रिपोर्टर आसिफ कुरैशी) – जिल्ह्यातील चिकणी कसबा येथील विवाहित दाम्पत्यावर प्रेमविवाहातून झालेल्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा प्रेमसंबंधाच्या कारणावरून तालुक्यातील अंतरगाव येथे युवकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. समीर शेख छोटु (२२) रा. अंतरगाव असं मृत तरूणाचं नाव असून सोमवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

आरोपी पवन विजय राठोड (२१) व त्याचे वडील विजय परसराम राठोड (५०) दोघेही रा. अंतरगाव यांनी प्लॅन करून समीर शेख याची हत्या केल्याची तक्रार मृताचा भाऊ आमिन शेख छोटू (२२) रा. अंतरगाव याने आर्णी पोलीस ठाण्यात दिली.

आरोपी पवन राठोड याच्या बहिणीसोबत समीर शेख छोटू याचे प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून समीरवर आरोपींनी प्राणघातक हल्ला केला. आरोपींच्या हल्ल्यात समीरच्या छाती आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्याला तत्काळ आर्णी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच आर्णी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला व दोन्ही आरोपींना अटक केली. आरोपींविरूध्द भादंवि कलम ३०२,३४ गुन्हा दाखल करण्यात आला. आर्णी तालुक्यात लागोपाठ दोन ‘ऑनर किलिंग’च्या घटना घडल्याने चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान, या प्रकरणी पुढील तपास आर्णी पोलिस स्टेशनचे ठाणेदार पितांबर जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक शिवराज पवार, बिट जमादार सतिश चौदार करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here