९५ किलो गांजासह पावणेपंधरा लाखांचा ऐवज जप्त; तीन आरोपींना अटक

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी विजयकुमार दिवाणजी) – खाडगाव ते पाच नंबर रिंग रोड परिसरात सापळा रचून लातूर एमआयडीसी पोलीसांनी बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ९५ किलो गांजासह १४ लाख ८६ हजार रुपयांचा मूुद्देमाल जप्त केला. शिवाय, तीन आरोपींना अटक केली असून, या तिघांविरुद्ध कलम २० (बी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका पांढ-या रंगाच्या कारमध्ये (एम.एच.२४. एएफ २०९५) गांजाची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती एमआयडीसी पोलीसांनी मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलीसांनी सापळा रचून पाच नंबर चौकात सदर क्रमांकाची कार थांबवून झडती घेतली असता प्लास्टिकच्या ४३ पिशव्यांमध्ये हिरव्या रंगाचा बि-मिश्रित गांजा आढळून आला. पोलीसांनी गांजाची वाहतूक करणा-या तिघांना ताब्यात घेतले असून, वैभव रानबा उजगरे (रा. खाडगाव रोड लातूर), मनोज शेषराव जोगेश्वरी (सारोळा रोड कुष्ठधाम, लातूर) आणि प्रेमनाथ चंद्रकांत शिंदे (भारत सोसायटी, गवळी नगर लातूर) अशी या आरोपींची नावे आहेत.

पोलीसांनी गांजा व कार जप्त केली असून, सदर ऐवज १४ लाख ८६ हजार ७३० रुपयांचा आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेत्वृखालील पथकाने ही कारवाई केली. पथकात पोलीस उपनिरीक्षक गणेश कदम, संदीप कराड, सहायक पोलीस उपनिरीक्षक जगताप, पोलीस अंमलदार सलगर, जाधव, बावणे, शेख, गिरी यांचा समावेश होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here