औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) – स्पर्धा परीक्षेचा निकाल लागत नसल्याने नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या परमेश्वर बाबूराव चव्हाण या २७ वर्षीय तरुणाने बुधवारी दुपारी स.भु. कॉलनीतील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. जिवलग मित्र, नातेवाइकांना कॉल करून जीवनयात्रा संपवत असल्याचे त्याने कळवले. पोलिसांना घेऊन नातेवाईक खोलीवर पोहोचले तेव्हा त्याचा मृतदेह टांगलेल्या अवस्थेत होता.
निमखेडा (ता. जाफराबाद, जि. जालना) येथील रहिवासी असलेला परमेश्वर वकिलीचे शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. त्याने काही वर्षांपूर्वी राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती. मात्र, निकाल लागत नसल्याने निराश झाला होता. बुधवारी दुपारी त्याच्यासोबत खोलीत राहणारे मित्र जेवणासाठी गेले. त्यानंतर त्याने गळफास घेतला.
आत्महत्येपूर्वी तीन पानांची सुसाइड नोट लिहून ठेवली. त्यात काही मित्रांची नावे आहेत. या मित्रांना मी गेल्याचे कळवा. माझ्या आत्महत्येला कुणालाही जबाबदार धरू नका, असे म्हटले आहे. याप्रकरणी क्रांती चौक ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिस नाईक आर. एस. तांदळे पुढील तपास करीत आहेत.






