नवम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन ‘ऑनलाईन’ माध्यमातून होणार !

जळगाव (रमेश शिंदे) – केंद्रात दुसर्‍यांदा मोदी सरकारच्या स्थापनेनंतर काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने कलम 370 रहित करणे, नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए), सर्वोच्च न्यायालयाने राममंदिराच्या बाजूने दिलेला ऐतिहासिक निर्णय, तसेच 5 ऑगस्ट 2020 या दिवशी नियोजित राममंदिराचे भूमीपूजन या सर्व सकारात्मक गोष्टी घडत आहेत. यातील नागरिकत्व सुधारणा कायदा हा ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’ची फलश्रृती आहे. वर्ष 2014 च्या ‘हिंदु राष्ट्र अधिवेशना’मध्ये अशा प्रकारचा ठराव संमत करण्यात आला होता.
‘सेक्युलर’ पक्षांची सत्ता असणार्‍या राज्यांत ‘सीएए’ कायदा लागू न करण्याचा निर्णय घेणे आणि हिंदुबहुल भारतात पीडित हिंदूंना न्याय मिळू न शकणे, हा मानवतेचा, तसेच लोकशाहीचा पराभव आहे. वर्ष 2011 च्या जनगणनेनुसार ‘2061 मध्ये भारतात हिंदू अल्पसंख्य होतील’, अशी स्थिती आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर हिंदूंना त्यांचे न्याय्य हक्क मिळण्यासाठी भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करावे, या प्रमुख मागणीसाठी ‘नवम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी दिली. ‘नवम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’ची माहिती देण्यासाठी आयोजित ऑनलाईन पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सद्गुरु (डॉ.) पिंगळे पुढे म्हणाले, ‘‘हे अधिवेशन 30 जुलै ते 2 ऑगस्ट आणि 6 ते 9 ऑगस्ट 2020 या कालावधीत सायंकाळी 6.30 ते 8.30 या वेळेत ‘ऑनलाईन’ पद्धतीने घेण्यात येणार आहे. नवम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात देश-विदेशांतून विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे नेते, कार्यकर्ते, अधिवक्ते, विचारवंत, संपादक, उद्योगपती आदी मोठ्या संख्येने ‘ऑनलाईन’ पद्धतीने सहभागी होणार आहेत.’’
अधिवेशनाविषयी अधिक माहिती देतांना हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे म्हणाले की, ‘गत 8 वर्षे गोव्यात होत असलेल्या या अधिवेशनांना खूप मोठा प्रतिसाद मिळाला; मात्र ‘कोविड-19’च्या आपत्तीमुळे यंदा हे अधिवेशन ऑनलाईन घ्यावे लागत आहे. अयोध्येत राममंदिराच्या भूमीपूजनाला काही ‘सेक्युलर’वादी अडथळे आणत आहेत. याउलट पाकिस्तानात एक मंदिर उभारणेही शक्य नसल्याची स्थिती आहे. पाकिस्तानात मंदिराला स्थान नाही, असे तेथील लोक म्हणत आहेत. हिंदुबहुल भारतात मात्र मशिदींची संख्या वाढत आहे. त्यामुळे आतातरी भारत हे ‘हिंदु राष्ट्र’ घोषित व्हायला हवे. हिंदु संघटना आणि संप्रदाय यांनी राष्ट्रहित अन् धर्महित यांसाठी योगदान देणे, तसेच समान कृती कार्यक्रम ठरवणे आणि हिंदुहिताचे ठराव संमत करणे, हे या ‘ऑनलाईन’ अधिवेशनाचे स्वरूप असेल.’’
या वेळी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. चेतन राजहंस म्हणाले, ‘‘आगामी आपत्काळाच्या दृष्टीने हिंदूंना साहाय्य करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांना विविध कौशल्ये विकसित करावी लागतील. या सेवाकार्याचे प्रशिक्षण देण्यासाठी 13 ते 16 ऑगस्ट या कालावधीत ‘हिंदु राष्ट्र संघटक अधिवेशना’चे आयोजन करण्यात आले आहे.’’
हे अधिवेशन सर्वांसाठी खुले असणार असून खालील ‘लिंक्स’वर त्याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. याचा हिंदुत्वनिष्ठांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आल्याची माहिती हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता रमेश शिंदे यांनी दिली आहे.
* YouTube Channel : www.youtube.com/HinduJagruti
*Facebook page : https://www.facebook.com/HinduAdhiveshan
*Twitter : https://twitter.com/HinduJagrutiOrg

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here