रिक्षा पार्किंग करण्याच्या वादातून कोपरी गावात दोन कुटुंबांमध्ये तुंबळ हाणामारी; एक जण जखमी

नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) – फुटपाथवर रिक्षा पार्किंग करण्याच्या वादातून कोपरी गावात दोन कुटुंबांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली. यामध्ये एक जण जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर एपीएमसी पोलिसांनी दोन्ही कुटुंबांतील सदस्यांवर एकमेकांच्या तक्रारीवरून हाणामारीसह दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे.

कोपरी गावात राहणारा विशाल पाटील त्याची रिक्षा ज्या ठिकाणी उभी करतो, त्याठिकाणी प्रतिक ठाकूर याने गुरुवारी रात्री आपली मोटारसायकल उभी केली होती. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास विशाल पाटील रिक्षा घेऊन त्याठिकाणी आला असता, त्याने प्रतिकला त्याची मोटारसायकल काढण्यास सांगितले. यावरून त्यांच्यात वाद झाला. प्रतिकने आपल्या आई-वडिलांना त्याठिकाणी बोलावून घेतले. त्यानंतर ओमकार ठाकूर, सुरेश ठाकूर व इतरांनी विशाल पाटीलसोबत वाद घालून त्याठिकाणी रिक्षा पार्क न करण्याबाबत समज देऊन त्याला मारहाण केली.

विशाल पाटील याच्या कुटुंबीयांना राग आल्याने त्याची आई वैजयंती पाटील ही ओमकार ठाकूर याच्या घरी जाब विचारण्यासाठी गेली. यावेळी पुन्हा त्यांच्यामध्ये वाद होऊन भांडण झाले. यावेळी ओमकार ठाकूरने वैजयंती पाटील यांच्यावर हात उचलल्याने या दोन्ही कुटुंबांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यात नितेश पाटील व इतर जखमी झाले. त्यामुळे त्यांना महापालिकेच्या रुग्णालायत दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एपीएमसी पोलिसांनी दोन्ही कुटुंबांतील १० ते १२ सदस्यांवर मारहाणीसह दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here