नाशिक (विशेष प्रतिनिधी) – गिरणानदीत होणारी बेकायदेशीर वाळू तस्करी थांबवून तात्काळ दोषी लोकांवर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नदीकाठावरील राहिवाशी नागरिकांकडून सातत्याने केली जात होती. या मागणीला अधिक जोर मिळण्याच्या अनुषंगाने बागलाणचे आ.संजय चव्हाण यांनी महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन या वाळूमाफियांचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, महसूल विभागाने कारवाई करत लोहोणेर, ढेंगोडा, वसाका परिसरातील सर्व चोररस्ते जे.सी.बी.ने चाऱ्या करून बंद केले असले तरी ठिय्या मारुन जमा केलेली शेकडो ब्रास वाळू मात्र या माफियांनी अंधाराचा फायदा घेऊन उचलून नेली आहे.
तरी या वाळूमाफियांचा कायमचा बंदोबस्त करुन या नदीकाठावरील परिसरात राहणाऱ्या नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.






