राममंदिर जमीन घोटाळा : प्रियांका गांधींची राम मंदिर चळवळीतील नेत्यांवर जोरदार टीका

नवी दिल्ली – अयोध्येतील जमिनीचा काल जो एक घोटाळा उघडकीला आणला गेला आहे, त्यावरून कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी आज राम मंदिर चळवळीतील नेत्यांवर जोरदार टीका केली आहे.

त्यांनी या संबंधात एक ट्‌विट जारी केले असून, त्यात त्यांनी म्हटले आहे की, केवळ भक्‍ती आणि श्रद्धेच्या आधारावर करोडो लोकांनी अयोध्येतील राम मंदिरासाठी मोठ्या प्रमाणावर पैशांचे योगदान दिले आहे. या पैशांचा दुरुपयोग म्हणजे पाप आणि अधर्म आहे. लोकांनी जी आस्था दाखवली आहे त्या आस्थेचा हा अवमान आहे, असेही प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे.

अयोध्या परिसरातील एक जमीन दोन कोटी रुपयांना विकत घेऊन ती राम मंदिर ट्रस्टला साडेअठरा कोटी रुपयांना विकली गेली, यात केवळ दहा मिनिटांत खरेदीचा व विक्रीचाही व्यवहार उरकला ही बाब काल काही जणांनी पत्रकारांच्या निदर्शनाला कागदपत्रांसह आणून दिली आहे. तो विषय पुढे लाऊन धरताना प्रियांका गांधी यांनी ही टीका केली आहे.

श्रीराम जन्मभूमी ट्रस्टचे सरचिटणीस चम्पत राय यांचाच या गैरव्यवहारात हात असल्याचा आरोपही कालच्या पत्रकार परिषदेत केला गेला आहे. या विषयावरून समाजवादी पार्टी आणि आम आदमी पक्षानेही अयोध्या चळवळीशी संबंधित लोकांवर आणि भारतीय जनता पक्षावरही टीका केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here