दरमहा ५ हजार मानधनाची मागणी करत राज्यातील ७० हजार आशा वर्कर्स आजपासून संपावर

मुंबई – कोरोना महामारित फ्रंट लाईनवर काम करणाऱ्या डॉक्टर नर्सेचे नेहमीच कौतुक करण्यात आले आहे. याच वेळी काम करणाऱ्या आरोग्यसेविकांकडे मात्र बऱ्याचदा दुर्लक्ष करण्यात आले आहे. कोरोनाच्या काळात गावा खेड्यात जाऊन फिल्ड वरील सर्व जबाबदारी सांभाळणाऱ्या आशा वर्कर्स आज पासून संपावर गेल्या आहेत.

कोरोना काळात मिळणाऱ्या भत्त्यात वाढ करावी या मागणीसाठी राज्यातील ७० हजार आशा वर्कर्स आजपासून संपावर आहेत.आशा वर्कर्सना कोरोना काळात दिवसाला ३५ रुपये इतका भत्ता दिला जात होता. म्हणजेच महिन्याला १ हजार रुपये भत्ता मिळतो हा भत्ता वाढवून महिन्याला ५ हजार रुपये भत्ता देण्यात यावा अशी मागणी राज्य आशा कर्मचारी कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. महाराष्ट्रात ७० हजार आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक यांच्या माध्यामातून आरोग्यविषयक ७२ प्रकारची कामे या आशा वर्कर्स करतात.

कोरोनाची परिस्थिती समजून घ्यावी. आशा वर्कर्सच्या मागण्यांचा सरकार विचार करत आहे. आशा वर्कर्सनी काम बंद करु नये. आशा वर्कर्स काम बंद करत असतील तर ते चुकीचं असल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. आशा संघटनेशी चर्चा केली होती तेव्हा त्या संप करणार नाहीत असे म्हणाल्या होत्या, असे राजेश टोपे यांनी सांगितले.

आशा वर्कर्सकडून जास्त काम करुन घेऊनही त्यांना कमी मानधन दिले जाते. सरकारने आम्हाला कधीही बोलावून चर्चा करुन आशा वर्कर्सच्या मानधनाविषयी बोलावे. आशा वर्कर्सचा हा संप लांबावा अशी आमची अजिबात इच्छा नाही. राज्यातील सर्व आशा वर्कर्सना राज्यातील लोकांची काळजी आहे. आशा वर्कर्सना योग्य मोबदला द्या आणि कामे करुन घ्या, असे आशा कर्मचारी कृती समितीकडून सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here