तातडीच्या उपाययोजनांद्वारे राज्यातील ऑक्सीजन निर्मिती आणि साठवणूक क्षमता वाढवावी

मुख्यमंत्र्यांचे ऑक्सीजन उत्पादक कंपन्यांना आवाहन

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) – राज्यात आज दरदिवशी १३०० मे.टन ऑक्सीजन निर्मिती होत असून ही निर्मिती ३ हजार मे.टनापर्यंत वाढवण्याच्या उद्देशाने शासनाने “ऑक्सीजन स्वावलंबन योजना” हाती घेतली आहे. याअंतर्गत ऑक्सीजन निर्मिती करणाऱ्या उद्योगांना अनेक प्रोत्साहने देण्यात आली आहेत. याचा लाभ घेत ऑक्सीजन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी तातडीच्या उपाययोजना करत राज्यातील त्यांची ऑक्सीजन निर्मिती तसेच साठवणूक क्षमता येत्या तीन ते चार आठवड्यात वाढवावी जेणे करून कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लागणारी ऑक्सीजनची अंदाजित गरज आपण भागवू शकू असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले तसेच याक्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्या उद्योजकांना शासन पूर्ण सहकार्य करील अशी ग्वाही ही त्यांनी यावेळी दिली

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सीजनची मागणी मोठ्याप्रमाणात वाढली असतांना ऑक्सीजन निर्माते, वितरक आणि पुरवठादार यांनी केलेले सहकार्य खुप मोलाचे आहे, त्यांच्या सहकार्यामुळेच राज्याची ऑक्सीजनची गरज भागवता आली असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, सध्या राज्यात दुसरी लाट पूर्णत्वाने ओसरलेली नाही. काही जिल्ह्यात आज ही रुग्णसंख्या कमी होतांना दिसत नाही. त्यात तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनाचा नवा विषाणु दिसून आला आहे. त्याची घातकता, परिणामकारकता आज आपल्याला माहित नाही. पण संभाव्य धोका लक्षात घेऊन आता आपल्या हातात जो काही वेळ आहे त्या कालावधीत ऑक्सीजन स्वालंबन मिळवणे गरजेचे आहे. आपण अनलॉक प्रक्रियेमध्येही अनेक गोष्टी हळुहळु उघडत आहोत, यामुळे उद्योग क्षेत्रही अडचणीत आहे, याची आपल्याला जाणीव आहे परंतू आज आपले पहिले प्राधान्य हे लोकांचे जीव वाचवण्याला आहे हेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

राज्यात काल आणि परवा विक्रमी (अनुक्रमे पाच आणि सहा लाख लोकांचे) लसीकरण झाले. आपली लसीकरणाची क्षमता दररोज १० लाख लोकांची असली तरी लसींची उपलब्धता मर्यादत आहे. ही बाब लक्षात घेता नवीन विषाणु आणि संभाव्य तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्याची तयारी आतापासूनच करणे आवश्यक आहे. यात तातडीने आणि दीर्घकालीन स्वरूपात करावयाच्या उपाययोजना हाती घेता येतील असे सांगून मुख्यमंत्र्यांनी राज्यातील विशेषत: दुर्गम भागातील ऑक्सीजन साठवणूक पूर्ण क्षमतेने करण्यात यावी असे आवाहन केले. संकटकाळात आपण सर्वांनी साथ दिल्यामुळेच आपण हे आव्हान पेलू शकलो आणि राज्यातील ऑक्सीजन व्यवस्थापन उत्तमपणे हाताळू शकलो असेही ते म्हणाले. असेच सहकार्य भविष्यकाळात द्यावे असे सांगतांना त्यांनी एकमेकांच्या सहकार्यातून महाराष्ट्राला सुरक्षित ठेवत पुढे जाऊ या असेही म्हटले.

यावेळी मुख्य सचिव श्री. कुंटे यांनी सर्व ऑक्सीजन उत्पादक कंपन्यांना त्यांच्या सहकार्याबद्दल धन्यवाद दिले. ते म्हणाले की मिशन ऑक्सीजन स्वावलंबन अंतर्गत राज्याला ऑक्सीजन निर्मितीच्या क्षेत्रात स्वावलंबी करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे. यासाठी उद्योजकांना प्रोत्साहने देण्यात आली आहेत त्याचा लाभ घेत उद्योजकांनी राज्यात विशेषत: दुर्गम ग्रामीण भागात आपले प्रकल्प उभारावेत, राज्यातील ऑक्सीजन साठवणूक क्षमता वाढवण्यास मदत करावी, ऑक्सीजनची वाहतूक करण्याच्या कामीही शासनाला सहकार्य करावे. त्यांनी आय.एस.ओ टँकर्सची उपलब्धता, ऑक्सीजन फिलिंग पाँईट वाढवणे, नायट्रोजन वाहून नेणाऱ्या टॅकर्सचे ऑक्सीजन टँकरमध्ये रुपांतर करणे आदी बाबींवर ही उपस्थितांकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.

कोरोनाशी लढतांना आम्ही सर्व राज्य शासनासोबत असल्याचे स्पष्ट करतांना ऑक्सीजन उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी महाराष्ट्र राज्यात त्यांना उत्तम सहकार्य मिळत असल्याचे सांगितले. त्यांनी महाराष्ट्राच्या उत्तम ऑक्सीजन व्यवस्थापनाचे कौतूक केले. तसेच महाराष्ट्राचे हे मॉडेल इतर राज्यात राबविण्याची आवश्यकता ही त्यांनी यावेळी व्यक्त केली. ऑक्सीजन साठवणूक, वाहतूक आणि निर्मितीच्या अनुषंगाने तांत्रिक बाबींवरही आजच्या बैठकीत चर्चा झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here