गेल्या पाच दिवसांपासून पारा ४० च्या वर : दिल्लीचे नागरिक धास्तावले
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत तापमानानं गेल्या ९० वर्षांचा रेकॉर्ड तोडलाय. हवामान विभागाकडून दिल्लीत ‘हिट वेव्ह’ची घोषणा करण्यात आलीय.
एखाद्या शहरात पारा ४० डिग्रीपेक्षा अधिक असेल तेव्हा ‘हिट वेव्ह’ची घोषणा करण्यात येते. गेल्या दोन दिवसांसाठी हवामान विभागाकडून ‘येलो अलर्ट’ही जारी करण्यात आला होता. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावरही दिसून येतो. अशा वेळी नागरिकांना हिटस्ट्रोक, डायरिया आणि टायफाईड यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. गेल्या तीन दिवसांपासून दिल्लीत जबरदस्त उन्हाच्या झळा बसत आहेत. दिल्लीच्या मंगेशपूरमध्ये ४५.२ डिग्री, नजफगडमध्ये ४४ डिग्री तर पीतमपुरा भागात ४४.३ डिग्री अंश सेल्शिअस तापमानाची नोंद करण्यात आली.
देशभरात मान्सूनचा सीझन सुरू असताना उष्णतेनं नागरिकांना भयभीत करून सोडलंय. भर दुपारीच नाही तर रात्रीही भयंकर उष्णतेचा सामना नागरिकांना करावा लागतोय. या दिवसांच्या रिपझिपसोबत नागरिकांना दिलासा मिळायला हवा होता. मात्र सध्या दिल्लीच्या आकाशात ढग आणि पावसाचा कुठेही पत्ता दिसत नाही आणि पारा ४० डिग्री अंश सेल्शिअसच्याही पुढे गेलाय.






