ठाकरे सरकारकडून शासन निर्णय जारी
मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण विभागानं राज्यातील कोरोनामुक्त भागातील ८ वी ते १२ वीचे वर्ग सुरु करण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र शासनानं याबाबत एक शासन निर्णय जारी केला आहे. कोरोनामुक्त क्षेत्रातील ग्रामपंचायती आणि स्थानिक स्वराज संस्थांच्या ठरावांनी शासन निर्णयात जारी करण्यात आलेल्या निकषांच्या आधारे पहिल्या टप्प्यात इयत्ता ८ वी ते १२ वीचे वर्ग सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
ग्रामीण भागात कोविड मुक्त गावातील ग्रामपंचायतीनं त्यांच्या अखत्यारीत असणारे गावातील शाळेतील इयत्ता ८ वी ते इयत्ता १२ वीचे वर्ग सुरु करणेबाबत पालकांशी चर्चा करुन ठराव करावा. शाळा सुरु करताना मुलांना टप्प्या टप्प्यात शाळेत बोलवण्यात यावं. म्हणजेच अदला बदलीच्या दिवशी, सकाळी आणि दुपारी महत्वाच्या विषयांना प्राधान्य देत शासनानं दिलेल्या कार्यपद्धतीचं पालन करण्यात यावं, असं शालेय शिक्षण विभागानं सांगितलं आहे.
मार्गदर्शक सूचना
संबंधित शाळेतील शिक्षकांची राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच गावात करण्यात यावी, किंवा त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर न करण्याबाबत दक्षता घ्यावी, असं शासनाकडून सांगण्यात आलं आहे.
१) शाळेत व शाळेच्या परिसरात स्वच्छता व आरोग्यदायी परिस्थिती सतत राखणे;
शाळेत हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देणे. थर्मामीटर, जंतूनाशक, साबण पाणी इत्यादी आवश्यक वस्तुंची उपलब्धता तसेच शाळेची – स्वच्छता व निर्जंतुकीकरण स्थानिक प्रशासनाने (ग्रामीण व शहरी) सुनिश्चित करावी.
एखाद्या शाळेत क्वारंटाईन सेंटर असल्यास स्थानिक प्रशासनाने ते इतर ठिकाणी स्थानापन्न करावे. स्थानिक प्रशासनाने अशा शाळेचे हस्तांतरण शाळा व्यवस्थापनाकडे करण्यापूर्वी त्याचे पूर्णत: निर्जंतुकीकरण करावे.
क्वारंटाईन सेंटर इतर ठिकाणी नेणे शक्य नसल्यास शाळा खुल्या परिसरात किंवा इतर ठिकाणी भरवावी.
२) शिक्षकांची कोविड-१९ बाबतची चाचणी:
संबंधित शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कोविड- १९ साठीची RTPCR / RAPID ANTIGEN चाचणी करावी.
3) बैठक व्यवस्था :
वर्गखोली तसेच स्टाफ रुम मधील बैठक व्यवस्था शारीरिक अंतराच्या नियमांनुसार असावी. वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे बैठक व्यवस्था असावी.






