मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : महाराष्ट्र विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन कालपासून सुरू झालं आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकार वर विरोधी पक्षांमध्ये चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली. तसेच ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष आक्रमक झाल्याने भाजपच्या 12 आमदारांवर निलंबनाची कारवाई देखील करण्यात आली.
भाजपच्या आमदारांवर झालेल्या कारवाईमुळे भाजप आमदार व विरोधी पक्ष नेते चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. त्याच पार्श्वभूमीवर काल निलंबित बारा आमदारांनी राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. तसेच संबंधित प्रकरणाची लेखी तक्रार राज्यपालांकडे केली आहे.
भाजप आमदारांवर झालेले निलंबनाची कारवाई ही हेतू पुरस्कृत असल्याचे भाजपकडून आरोप करण्यात येत आहे. तसेच या प्रकरणात आहे बारा आमदार न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती समोर येत आहे. झालेल्या कारवाईबाबत भाजप आमदार न्यायालयात धाव घेणार असल्याने पुढे या प्रकरणात नेमकं काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, राज्य सरकार कडून झालेल्या कारवाईनंतर भाजपनेते आशिष शेलार यांनी महाराष्ट्र सरकार हे तालिबानी सरकार असल्याचं म्हटलं आहे. तसेच तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्याकडून शिवीगाळ करण्याचा आरोप केल्यानंतर अतुल भातखळकर यांनी ट्विट करत शिवीगाळ कोणी केली हे जाणून घेण्यासाठी भास्कर जाधव यांच्या नार्को टेस्टची मागणी केली आहे.






