पावसाळी अधिवेशनात जनहिताचे निर्णय घेतल्याचे समाधान – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारपरिषदेत मांडली आपली भूमिका

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : पावसाळी अधिवेशनाचा कालावधी दोन दिवसांचाच असला तरीही या अधिवेशनात जनतेच्या हिताचे कामकाज करता आले याचे समाधान आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळ अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. या अधिवेशनात ९ विधेयके दोन्ही सभागृहांनी मंजूर केली. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, संसदीय कार्यमंत्री अनिल परब, राज्यमंत्री संजय बनसोडे उपस्थित होते.

काल विधानसभेत झालेला गोंधळ आणि त्यानंतर विरोधी पक्षाच्या १२ आमदारांचे निलंबन या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले आहे. काल विधानसभेत जे काही घडले ते महाराष्ट्राच्या परंपरेला लाजिरवाणे होते. ही आपली संस्कृती नाही. आपण उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार देतो. आता ज्या प्रमाणे कामकाज चालले आहे, ते पाहता दर्जा खालावला असल्याचे दिसत आहे, असे सांगतानाच लोकप्रतिनिधींकडून जनतेच्या काही अपेक्षा असतात. काल जे दृश्य पाहायला मिळाले ते दृश्य शरमेने मान खाली घालायला लावणारे होते, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना जोरदार टोले लगावले आहेत.

आमदार भास्कर जाधव यांच्यासोबत जे काही घडले ते जेव्हा मी ऐकले तेव्हा महाराष्ट्रात असे घडू शकते का, यावर माझा विश्वासच बसत नाही. सत्ता एके सत्ता हाच जर अट्टाहास असेल तर सगळेच मग वाईट चालले आहे, असे म्हणावे लागेल. हे सर्व जबाबदार पक्षाकडून घडल्याचे सांगत त्यांनी विरोधी पक्षाकडे बोट दाखवले.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, विधानसभेत ओबीसी समाजाबाबत ठराव मांडण्यात आला होता. त्यावर तुम्हाला जे काही बोलायचे आहे ते बोलावे, काही वेडेवाकडे करण्याची आवश्यकता नव्हती. सभागृहात समोर माईक असताना देखील बेंबीच्या देठापर्यंत ओरडण्याची काहीच गरज नाही. वेडेवाकडे काही तरी करायते आरडाओरड करायची ही लक्षणे काही लोकशाहीची नाहीत. राजदंड पळवणे ही काय पद्धत नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना टोले लगावले आहेत.

पावसाळी अधिवेशन दोन दिवसांचे होते. या दोन दिवसांमध्ये जनतेला समाधान मिळेल, असे काम केले आहे, असे सांगतानाच अधिवेशनातील कामकाजाला दर्जा मात्र खालावला चालला असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. ज्यांच्याकडून हे घडले त्यांनी त्यात लवकरात लवकर सुधारणा करावी अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here