शिवसेना आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे वेधले शासनाचे लक्ष
मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिवसेना आमदार डॉ मनीषा कायंदे यांनी कोरोनासंदर्भात जनजागृती तसेच लोककलावंतांना आर्थीक मदत अशा दुहेरी उद्देशाने मंजूर झालेला निधी लवकरात लवकर मंजूर करण्यासाठी औचित्याचा मुद्दा उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले.
महाराष्ट्र शासनाने ०५ मे २०२१ रोजी प्रयोगात्मक तत्वावर कलेच्या माध्यमाचा वापर करण्या संदर्भात निर्णय झाला. त्याअनुषंगाने कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी जनजागृतीकरीता पाच कोटीची तरतूद करण्यात आली होती. परंतु त्यास वित्त विभागाची मंजुरी आवश्यक आहे.
याविषयी सभागृहात बोलताना शिवसेना आमदार डॉ मनीषा कायंदे यांनी सांगितले, कोरोना महामारी अजूनही संपलेली नाही,शहरांमध्ये कोरोना विषयी जनजागृती झाली असली तरीही ग्रामीण व दुर्गम भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे, त्याकरिता संबंधित निर्णयाची तातडीने अमंलबजावणी करणे गरजेचे आहे. यामुळे ग्रामीण भागातील लोककलावंतांना रोजगार उपलब्ध होईल व कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी ग्रामीण नागरिकांमध्ये जनजागृती होईल. कारण आजही ग्रामीण भागामध्ये कोरोना तसेच कोरोना लशीबाबत अनेक गैरसमज आहेत.






