राजू साप्ते यांच्या आत्महत्येची घेतली गंभीर दखल
मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : मराठी चित्रपट सृष्टीतील वाढलेली गुन्हेगारी व दहशत मोडून काढण्यासाठी गृह विभागाने कठोर पाऊल उचलले असून यापुढे अशाप्रकारची गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. याप्रकरणी दोषी असलेल्या सर्वांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहेत.
मंत्रालयातील समिती सभागृहात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ कला दिग्दर्शक राजू साप्ते यांच्या आत्महत्येसंदर्भात व मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकार, तंत्रज्ञ व निर्माता यांना चित्रपट युनियनच्या पदाधिकाऱ्यांकडून होणाऱ्या त्रासाबद्दल पोलीस विभागाकडून करणे आवश्यक असलेल्या कार्यवाहीबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी वळसे पाटील यांनी कठोर शब्दांत इशारा दिला. चित्रपट सृष्टीतील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था करणे गरजेचे आहे. यापूर्वीच्या सर्व गुन्ह्यांसंदर्भातील दोषींवर कठोर कारवाई करावी. ज्यायोगे सर्वावर वचक निर्माण होईल. आवश्यकता भासल्यास विशेष चौकशी समिती नेमण्यात यावी असे निर्देश वळसे पाटील यांनी दिले.
पोलीस सह आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी गोरेगाव फिल्मसिटी परिसरात पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबत सविस्तर माहिती दिली. दादासाहेब फाळके चित्रनगरी येथील व्यवस्थापकीय संचालिका मनीषा वर्मा यांनी चित्रनगरी अंतर्गत सुरु असलेल्या चित्रीकरणासाठी राज्यशासनाकडून देण्यात येणाऱ्या सवलती आणि केलेल्या उपाययोजना याबाबत तपशील दिला. यावेळी उपस्थित निर्माता, दिग्दर्शक यांनी या क्षेत्रात वाढलेली गुन्हेगारी व त्यांच्यावर वाढलेला दबाव आणि समस्या व त्यांच्या मागण्या गृहमंत्र्याकडे मांडल्या. या बैठकीला सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर, गृह विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पोलीस महासंचालक संजय पांडे, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, कामगार आयुक्त महेंद्र कल्याणकर, विद्या चव्हाण, पुण्याच्या माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, कला दिग्दर्शक नितीन देसाई, मेघराज भोसले, बाबासाहेब पाटील आदी उपस्थित होते.






