मुंबई (प्रतिनिधी चेतन किर्दत) : ज्येष्ठ लेखिका व पत्रकार पुष्पा त्रिलोके कर-वर्मा यांचे शुक्रवारी पहाटे कांदिवली येथील रुग्णालयात वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८५ वर्षांच्या होत्या. साप्ताहिक ‘लोकप्रभा’चे माजी संपादक प्रदीप वर्मा यांच्या त्या पत्नी होत.
पुष्पा यांनी आपल्या पत्रकारितेची सुरुवात संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे मुखपत्र ‘दैनिक मराठा’मधून केली. आणीबाणीत दैनिक मराठा बंद पडल्यानंतर वृत्तपत्र स्वातंत्र्य आणि आणीबाणीच्या निषेधार्थ सुरू झालेल्या ‘पहारा’ या सायंदैनिकाच्या संपादकपदाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. आणीबाणीचा निषेध करणाऱ्या सभा, संमेलनांचा वृत्तान्त तसेच भूमिगत नेत्यांच्या सडतोड मुलाखती प्रसिद्ध करून पुष्पा यांनी सरकारवर दबाव निर्माण केला होता.
पुष्पा यांनी मुक्त पत्रकार म्हणून अनेक साप्ताहिकांमध्ये आणि दैनिकांमध्ये कला व सांस्कृ तिक विषयांवर लेखन केले. ‘द्रौपदीची थाळी’ हे त्यांचे पाककृतींवर आधारित पुस्तक गाजले. प्रतिमाशास्त्र हा त्यांच्या विशेष अभ्यासाचा विषय होता. त्यासाठी त्यांनी भारतभ्रमण के ले. पुष्पा यांनी पतीसह ‘संस्कृती संवर्धन अभियाना’स सुरुवात के ली. त्याद्वारे या विषयाचे दस्तावेजीकरण करणाऱ्या चित्रफिती तयार के ल्या. ‘प्रकाशनगरी काशी’, ‘देवांची जन्मकथा’, ‘पृथ्वीचे मारेकरी’, ‘गर्द अंधार’, ‘मिशन अंतरिक्ष’ ही पुस्तके त्यांनी लिहिली.






