माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचे निधन

१९८३च्या विश्वविजेत्या संघातील होते खेळाडू

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू आणि १९८३च्या विश्वविजेत्या भारतीय संघाचे सदस्य यशपाल शर्मा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या ६६व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. माजी कर्णधार कपिल देव यशपाल शर्मा यांच्या मृत्यूनंतर अश्रू रोखू शकले नाहीत. टीव्ही चॅनेलवर बोलताना ते रडू लागले. यशपाल यांनी बीसीसीआयच्या निवड समितीच्या सदस्यपदाची जबाबदारीही पार पाडली होती.

भारताकडून यशपाल शर्मा यांनी ३७ कसोटी सामन्यांमध्ये १६०६ धावा केल्या आहेत. यात १४० धावा ही त्यांची सर्वोत्तम खेळी होती. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यांनी ४२ सामन्यात २८.४८च्या सरासरीने ८८३ धावा केल्या.

१९८३च्या वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या विजयासह सुरुवात केली. शर्मा यांनी यात महत्त्वाची भूमिका बजावली. जेव्हा ते क्रीजवर आले तेव्हा संघाची धावसंख्या ३ बाद ७६ अशी होती, त्यानंतर भारताने ५ बाद १४१ अशी मजल मारली. शर्मा यांनी १२० चेंडूंत ८९ धावांची खेळी खेळली. ऑस्ट्रेलिया विरुद्ध आक्रमक ४० धावा असोत किंवा कठीण परिस्थितीत इंग्लंडविरुद्ध ६१ धावांची खेळी, शर्मा यांनी भारताला नेहमीच तारले. शर्मा यांनी या स्पर्धेत ३४.२८च्या सरासरीने २४० धावा केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here