मुंबईचं विमानतळही अदानींच्या ताब्यात

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्णपणे अदानी समूहाच्या ताब्यात गेले आहे. विमानतळाच्या व्यवस्थापनाचे पूर्ण नियंत्रण अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेडकडे (एएएचएल) नेण्याचा निर्णय मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडच्या (मिआल) संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

मुंबईचे विमानतळ जीव्हीके समूहाकडे होते. परंतु, जीव्हीके समूह आर्थिक संकटात आल्याने हे विमानतळ अदानी समूहाने खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. विविध पातळ्यांवरील न्यायिक प्रकरणांनंतर अखेर हे विमानतळ खरेदी करण्याला अदानी समूहाला हिरवा कंदीला मिळाला. मागीलवर्षी ही खरेदी प्रक्रिया सुरू झाली होती. त्यानुसार अलिकडेच केंद्र सरकार व राज्य सरकारच्या ‘सिडको’ महामंडळानेही या खरेदीला मान्यता दिली होती. या सर्व पार्श्वभूमीवर ‘मिआल’च्या संचालक मंडळाची बैठक आज झाली. त्यामध्ये या विमानतळाचे पूर्ण व्यवस्थापन एएएचएलकडे सोपविण्यास हिरवा कंदील मिळाला.

‘मिआल’मध्ये जीव्हीके समूहाची हिस्सेदारी ५०.५० टक्के होती. बिडवेस्ट कंपनीचा हिस्सा १३.५० टक्के व एअरपोर्ट कंपनी ऑफ साऊथ आफ्रिका यांची भागीदारी १० टक्के होती. उर्वरित २६ टक्के हिस्सा भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (एएआय) माध्यमातून केंद्र सरकारकडे आहे. विमानतळ खरेदी करण्याच्या प्रक्रियेत अदानी एंटरप्राइझेसने सुरुवातीला यापैकी २३.५० टक्के हिस्सा १६८५ कोटी रुपयांना पूर्णपणे खरेदी केला. त्यानंतर पुढील टप्प्यात जीव्हीके समुहाचा ५०.५० टक्के हिस्सा खरेदी केला. हा हिस्सा खरेदी करण्याआधी जीव्हीकेच्या डोक्यावर असलेले २५०० कोटी रुपयांचे कर्जदेखील अदानी समूहाने भागभांडवलात परावर्तित केले.

‘एएएचएल’ ही अदानी एंटरप्राइझेसची उपकंपनी आहे. मुंबई विमानतळ व्यवस्थापनाचे नियंत्रण घेतल्यानंतर आता कंपनीच्या भात्यात आठ विमानतळ आले आहेत. यामुळे ही देशातील सर्वात मोठी विमानतळ पायाभूत सुविधा कंपनी झाली आहे. देशभरातील विमानतळांवरील एकूण प्रवाशांपैकी २५ टक्के प्रवासीसंख्या आता अदानी समूहांतर्गत आली आहे. ‘मिआल’च्या व्यवस्थापनाचा ताबा आल्यापासून ३३ टक्के कार्गो वाहतूकही अदानी समूहांतर्गत आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here