वैभववाडी नगर पंचायत कार्यक्षेत्रातील नळ पाणी योजनेबाबतचा प्रस्ताव सादर करा – मंत्री उदय सामंत

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : वैभववाडी नगर पंचायत कार्यक्षेत्रातील नळ पाणी योजनेसाठी सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेमधून ७ कोटी १५ लाख निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करावा असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालक मंत्री उदय सामंत यांनी संबंधितांना दिले. याबाबत नगरविकास विभागाशी चर्चा करुन यावर मार्ग काढण्यात येईल असे आश्वासन श्री. सामंत यांनी दिले.

वैभववाडी नळ पाणी योजनेच्या कामाला प्राधान्य देऊन या कामाला जलद गतीने सुरु करा, असे निर्देश ही श्री. सामंत यांनी दिले. वैभववाडी नगर पंचायत जिल्हा सिंधुदुर्ग कार्यक्षेत्रातील नळ पाणी योजनाबाबत आढावा बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस मुख्य अभियंता श्री. नंदनवरे, श्री. गजभिये, कार्यकारी अभियंता श्री. वानखेडे, कणकवली प्रशासक राजमाने मॅडम तसेच संबंधित विभागाचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

श्री. सामंत म्हणाले की, वैभववाडी नळ पाणी योजनासाठी सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेतून ७ कोटी १५ लाख निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच चौदाव्या व पंधराव्या वित्त आयोगाचा उरलेला निधी याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. उरलेली रक्कम जिल्हा नियोजन समिती (डिपीसी) मधून देण्यात येईल असे ही त्यांनी यावेळी सांगितले.

देवगढ नगर पंचायतीच्या लोकसंख्येच्या तुलनेत लागणारा निधी कमी करुन त्याबाबतचा प्रस्तावाचे पुनर्विलोकन करुन तातडीने सादर करावा, असे ही श्री. सामंत यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here