तांत्रिक अडचणींमुळे संकेतस्थळ करावे लागले बंद
पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : सीईटी परिक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया मंगळवारपासून सुरू झाली. पहिल्याच दिवशी १ लाख ३० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज भरले. मात्र अर्ज भरताना तांत्रिक अडचणी येत होत्या. या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाने संकेतस्थळ तूर्तास बंद करण्याचा निर्णय घेतला. तांत्रिक अडचणी दूर करून संकेतस्थळ सुरू करण्यात येणार असून, अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना पुरेसा कालावधी दिला जाईल, असे राज्य मंडळाने गुरुवारी स्पष्ट केले.
राज्य मंडळाशी संलग्न कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सीईटी घेतली जाणार आहे. ही सीईटी ऐच्छिक आहे. मात्र प्रवेश देताना सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य असेल. राज्य मंडळामार्फत २१ ऑगस्टला सकाळी अकरा ते दुपारी एक या कालावधीत अकरावीसाठीची सीईटी होणार आहे. विद्यार्थ्यांना अकरावीच्या सीईटीसाठीचे प्रवेश अर्ज भरण्याची सुविधा २० ते २६ जुलै या कालावधीत उपलब्ध करून दिली होती.
उर्वरित जागांवर अन्य विद्यार्थ्यांना मूल्यमापन पद्धतीतील गुणांच्या आधारे प्रवेश दिले जातील. त्यामुळे अकरावीच्या सीईटीची कार्यवाही होईपर्यंत अकरावीमध्ये प्रवेश होणार नाहीत.






