सेलू (क्राइम रिपोर्टर आसिफ कुरैशी) : लोकांच्या हक्क संरक्षणासाठी रक्षक म्हणून ठेवलेले पोलीसच कधी कधी भक्षक बनतात हे दाखविणारी घटना येथे घडली आहे. येथील उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाल व पोलीस नाईक गणेश लक्ष्मणराव चव्हाण या दोघांनी एका तक्रारदाराकडून सुरुवातीला दोन कोटी रुपयांची लाच मागितली, त्यानंतर तडजोड करत दीड कोटी रुपयांची मागणी केली आणि शेवटी या व्यवहारात दहा लाख रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारली. या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकाराने खळबळ उडाली आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की तक्रारकर्त्याच्या मित्राचा अपघाती मृत्यू झालेला होता. ३ मे २०१९ रोजी सेलू पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील मृताच्या पत्नी सोबत तक्रारकर्त्याचे झालेले मोबाईलवरील संभाषण व्हायरल झाले, तेव्हा ९ जुलै २०२१ रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी पाल यांनी तक्रारकर्त्यास कार्यालयात बोलावून ‘तुझी व्हायरल झालेली क्लिप मी ऐकली असून त्यातून तुला बाहेर पडायचे असेल तर मला दोन कोटी रुपये द्यावे लागतील’ असे सुनावले. या तक्रारकर्त्यास वारंवार फोन करून अर्वाच्य शिवीगाळ केली. तसेच दोन कोटी रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारकर्त्याने या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई यांच्याकडे २२ जुलै रोजी प्रत्यक्ष येऊन लेखी तक्रार दिली.
त्या तक्रारीच्या अनुषंगाने मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या एका पथकाने २३ जुलै रोजी पडताळणी केली, तेव्हा उपविभागीय पोलिस अधिकारी पाल यांनी दोन कोटी रुपयांची मागणी करीत तडजोडीत एक दीड कोटी रुपये इतकी रक्कम मागितली. त्यापाठोपाठ या विभागाने सापळा रचून केलेल्या कारवाई दरम्यान पोलीस नाईक चव्हाण याने तक्रारकर्त्याच्या भावाकडून त्यापोटी दहा लाख रुपयांची लाच स्वीकारली तेव्हा त्यास रंगेहात पकडण्यात आले. मुंबईच्या प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केलेल्या या कारवाईने पोलीस खात्यात मोठी खळबळ उडाली आहे.






