राहुरी येथील डॉ. बाबुराव तनपुरे सहकारी साखर कारखान्यावर महावितरणची कारवाई

थकीत वीजबिल न भरल्याने कारवाई; भाजप खासदार सुजय विखेंना दणका

नगर (प्रतिनिधी) : येथील भाजपा खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांची सत्ता असणाऱ्या राहुरी येथील डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचा वीज पुरवठा महाराष्ट्र सरकारच्या ऊर्जा विभागांतर्गत येणाऱ्या महावितरण कंपनीने खंडित केला आहे. अनेकदा नोटिसा पाठवूनही कारखान्याने थकीत वीजबिल न भरल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. यामुळे कारखान्याचा परिसर आणि कामगार वसाहत अंधारात बुडाली आहे.

हा कारखाना ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मतदारसंघात आहे. त्यांच्या आजोबांचे नाव कारखान्याला देण्यात आलेले आहे. त्यांचे वडील माजी खासदार डॉ. प्रसाद तनपुरे यांचेही या कारखान्यात मोठे योगदान होते. त्यांची दीर्घकाळ या कारखान्यावर सत्ता होती. मात्र, नंतर कारखाना अडचणीत येऊन बराच काळ बंद राहिला. लोकसभा निवडणुकीपूर्वी विखे यांनी प्रवरानगरच्या कारखान्याच्या माध्यमातून हा कारखाना ताब्यात घेऊन सुरू केला. त्याचा निवडणुकीत त्यांना फायदा झाला. नंतर मात्र, जिल्हा बँकेच्या माध्यमातून या कारखान्याची आर्थिक कोंडी करण्याचाही प्रयत्न झाला. त्यावरूनही आरोपप्रत्यारोप रंगले होते. कारखाना आर्थिक अडचणीतून बाहेर आलाच नाही. आता वीज तोडण्याची नामुष्की कारखान्यावर आली आहे.

सद्यस्थितीत राहुरी येथील डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्यावर डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाची सत्ता असून कारखाना आर्थिक अडचणीत आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वीच विखेंनी यामध्ये लक्ष घालून काही काळ कारखाना चालविला. मात्र, अडथळे येत गेले. कामगारांची देणीही थकली होती. तसेच वीजबिलही थकले. यासंबंधी कंपनीने अनेकदा नोटिसा पाठविल्या. मात्र, कारखान्याने कोट्यवधी रुपयांची ही थकबाकी भरली नाही. सध्या वीज कंपनीने थकबाकी वसुलीची मोहीम कडक केली आहे. त्यामुळे या कारखान्याचीही वीज तोडण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here