खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलल्याच्या निषेधार्थ पुण्यात काँग्रेसचे निदर्शने

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार असलेला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार म्हणून ओळखला जाणार आहे. गेली अनेक वर्षे या पुरस्कारला असलेलं राजीव गांधी यांचं नाव बदलून केंद्रातील मोदी सरकारने गांधी घराण्याला असलेला विरोध दर्शवला आहे. असे म्हणत पुण्यात काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्रातील मोदी सरकार विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.

राजीव गांधी यांनी या देशासाठी आपलं बलिदान दिलं, अशा राजीव गांधी यांचं नाव बदलून मेजर ध्यानचंद यांचं नाव देण्यात आलं आहे. खरंच जर या सरकारला मेजर ध्यानचंद यांच्याबद्दल आदर असता तर आज त्यांना भारतरत्न द्यायला पाहिजे होते. केवळ गांधी कुटुंबियांच्या बद्दल असलेल्या द्वेषापोटी या सरकारने या खेलरत्नचा नाव राजीव गांधी खेलरत्न बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न ठेवण्यात आले आहे, अशी टिका यावेळी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड यांनी केली.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करत, खेलरत्न पुरस्काराला मेजर ध्यानचंद यांचं नाव दिलं जावं यासाठी आपल्या देशभरातून लोकांच्या विनंती येत होत्या असं त्यांनी ट्वीटमध्ये सांगितलं आहे. देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार त्यांच्या नावे देणं योग्य असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.’देशवासियांनी मांडलेल्या मतांबद्दल मी त्यांचा आभारी आहे. मेजर ध्यानचंद हे भारताला सन्मान आणि आदर मिळवून देणाऱ्या भारतातील महत्वाच्या खेळाडूंपैकी एक होते. देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्काराला त्यांचं नाव देणंच योग्य आहे’ असं मोदींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here