मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, भायखळा आणि महानायक अमिताभ बच्चन यांचा बंगला अशा चार ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आले आहेत, असे सांगून फोन कट करण्यात आला. मात्र या कॉलनंतर मुंबई पोलिसांची झोप उडाली असून या चारही ठिकाणी कसून शोध घेण्यात येत आहे.
रात्री ८ वाजून ५३ मिनिटांच्या सुमारास १०० नंबरवर बॉम्ब ठेवल्याबाबतचा फोन आला. या व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, भायखळा आणि महानायक अमिताभ बच्चन यांचा बंगला अशा चार ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याचे सांगितले. त्यानंतर माहितीचं गांभीर्य लक्षात घेत ज्या नंबरवरून हा कॉल आला होता त्या नंबरवर पोलिसांनी लगेचच संपर्क साधला तेव्हा माझ्याकडे असलेली माहिती मी तुम्हाला दिली आहे. आता मला डिस्टर्ब करू नका, इतकंच सांगून त्या व्यक्तीने फोन ठेऊन दिला. त्यानंतर त्या व्यक्तीशी संपर्क होऊ शकलेला नाही. त्याने फोन स्विच ऑफ करून ठेवला असून पोलिसांची डोकेदुखी त्यामुळे वाढली आहे.मुंबई पोलिसांपुढे एका निनावी फोनमुळे आव्हानात्मक स्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर मुंबई पोलिसांसोबतच रेल्वे पोलीसही शोध घेत आहेत. टर्मिनसवरील तिकीट घर, वेटिंग स्पेस, स्टॉल्स, फलाट अशा सर्व ठिकाणी कोपरानकोपरा तपासण्यात आला आहे. काही भाग रिकामाही करण्यात आला होता.






