नवी दिल्ली : अफगाणिस्तानातील चिंताजनक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताने रविवारी तीन विमानांतून सुमारे ४०० नागरिकांना मायदेशी आणले. त्यांत ३२९ भारतीयांचा आणि दोन अफगाण संसद सदस्यांचा समावेश आहे.
अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथून प्रथम १६८ नागरिकांना घेऊन आलेले भारतीय हवाई दलाचे सी-१७ हे विमान रविवारी दिल्लीजवळील हिंडोन विमानतळावर उतरले. या विमानातून आलेल्या नागरिकांमध्ये २३ अफगाण शीख आणि हिंदूंचा समावेश आहे. या १६८ जणांच्या गटात अफगाणिस्तानच्या संसद सदस्य अनारकली होनरयार आणि नरेंद्र सिंग खालसा तसेच त्यांचे कुटुंबीय यांचा समावेश आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी दिली.
अफगाणिस्तानातून ८७ भारतीय आणि दोन नेपाळी नागरिकांचा समावेश असलेल्या आणखी एका गटाला ताजिकिस्तानची राजधानी दुशान्बे येथून एअर इंडियाच्या खास विमानाने दिल्लीत आणण्यात आले. या नागरिकांना प्रथम काबूल येथून भारतीय हवाई दलाच्या विमानाने दुशान्बे येथे आणण्यात आले होते. एअर इंडियाच्या विमानाने ८७ भारतीयांना मायदेशी पाठवण्यात येत आहे. त्यात आणखी दोन नेपाळींचा समावेश आहे.






