रत्नागिरी – सोगावकर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी नाशिक येथे दाखल गुन्ह्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. नारायण राणे यांना रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरमधील गोळवली येथून अटक करण्यात आली आहे. राणे यांना स्थानिक कोर्टात हजर करण्यात येणार आहे, असेही सांगण्यात येत आहे.
दरम्यान, राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज स्थानिक कोर्टाने फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयातही धाव घेतली होती. मात्र तिथेही त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घेण्यास नकार देण्यात आला आहे. त्यामुळे राणे यांन तूर्त कोणताही दिलासा मिळू शकलेला नाही.
दरम्यान, भाजपकडून सरकारवर गंभीर आरोप करण्यात आला. रत्नागिरी पोलीस नारायण राणे यांना अटक करण्यासाठी आले मात्र त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा अटक वॉरंट नव्हता. पोलीस अधीक्षकांकडे आम्ही वॉरंटची मागणी केली. मात्र ते वॉरंट दाखवू शकले नाहीत, असा दावा भाजपचे प्रमोद जठार यांनी केला. राणे यांना अटक करण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकण्यात आला.
दरम्यान, राणे यांच्यावरील कारवाईचे वार्तांकन करण्यासाठी आलेल्या माध्यम प्रतिनिधींवर राणे समर्थकांनी दोन खुर्च्या फेकल्याने तणाव निर्माण झाला होता. त्यावर प्रमोद जठार यांनी सर्वांची माफी मागत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.






