सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील सावडाव येथील मारहाणीच्या घटनेनं पुन्हा खळबळ उडाली आहे. कणकवली तालुक्यातील सावडाव ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केल्याच्या रागातून नयना सावंत आणि वैभव सावंत यांना अमानुष पद्धतीने मारहाण करण्यात आलीय.
ही मारहाण सावडाव ग्रामपंचायतचे उपसरपंच दत्ताराम काटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली असल्याचा आरोप करत ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी मारहाणीनंतर जखमी दाम्पत्यांचे फोटो फेसबुक वर पोस्ट केलेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्याची वाटचाल बीडच्या दिशेने होतेय, पोलिसांनी यात हस्तक्षेप केला नाही , तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचाही बीड जिल्हा झाल्याशिवाय राहणार नाही, अशी शंका आपल्या मनात असल्याचं माजी आमदार वैभव नाईक यांनी सांगितलंय. याबाबत दत्ताराम काटे आणि अन्य सात जणांवर परस्पर विरोधी गुन्हे कणकवली पोलिसांनी दाखल केले आहेत. मात्र, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.







