अहिल्यानगर (अहमदनगर जिल्हा क्राइम रिपोर्टर अण्णासाहेब बनसोडे) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी १४ एप्रिलपासून सुरु असलेले माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे उपोषण आज तिसऱ्या दिवशी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, विधानपरिषदेचे नेते अंबादास दानवे, खासदार निलेश लंके, माजी आमदार दादासाहेब कळमकर यांच्या हस्ते लिंबू सरबत घेवून सोडण्यात आले.
मात्र, आरोपींना लवकरात लवकर अटक झाली नाही तर हा विषय राज्य स्तरावर नेण्याचा इशारा सर्वांनी दिला. आंदोलन वेगळ्या स्वरूपात सुरू ठेवू, असे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी उपोषण सोडताना सांगितले.
राहुरीत कडकडीत बंद
आज माजी मंत्री तनपुरे यांचे वजन अडीच किलोने घटले होते. वैद्यकीय सल्ल्यानुसार त्यांना सलाईन सुरू केले होते. उपोषणार्थींपैकी पप्पू कल्हापुरे यास तब्येत खालावल्याने नगरला शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. यावेळी माजी आमदार प्रसाद तनपुरे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे, रवींद्र मोरे, सुरेश वाबळे, नंदकुमार तनपुरे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपोषणाला पाठिंबा म्हणून राहुरी दिवसभर बंद होती. बंद शांततेत पार पडला. आरोपीच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे आंदोलकांनी दहन केले.







