१९७१ च्या युद्धातील विजयोत्सवानिमित्त स्वर्णिम विजय मशालीचे मुख्यमंत्री करणार स्वागत; गेट-वे-ऑफ इंडिया येथे १ सप्टेंबरला कार्यक्रम

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : भारताने १९७१ मधील पाकिस्तान विरोधातील युद्धात मिळविलेल्या विजयानिमित्त काढण्यात आलेल्या स्वर्णिम मशालीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वागत करणार आहेत. स्वर्णिम विजय वर्ष निमित्त आयोजित परिक्रमेतील या मशालीचे येत्या १ सप्टेंबर २०२१ रोजी मुंबईत गेट-वे-ऑफ इंडिया येथे सैन्याच्या तिन्ही दलांच्यावतीने स्वागत करण्याचे निमंत्रण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले.

भारताने पाकिस्तानला १९७१च्या युद्धात नमवले होते. या युद्धाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त देशभर ‘स्वर्णिम विजय वर्ष” साजरे करण्यात येत आहे. त्यानिमित्त स्वर्णिम विजय मशालीची देशभर परिक्रमा सुरु आहे. या स्वर्णिम विजय वर्ष मशालीचे येत्या १ सप्टेंबर २०२१ रोजी मुंबईत आगमन होणार आहे.

या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सशस्त्र दलाच्यावतीने वर्षा शासकीय निवास्थानी निमंत्रण देण्यात आले. त्यासाठी भारतीय नौदलाच्या वेस्टर्न कमांडचे व्हाईस अँडमिरल आर. हरी कुमार यांनी तसेच भारतीय लष्कराचे महाराष्ट्र, गुजरात आणि गोवाचे जनरल कमांडिग ऑफिसर लेफ्टनंट जनरल एस.के. पराशर यांनी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांची सदिच्छा भेट घेऊन या स्वर्णिम विजय वर्ष मशाल कार्यक्रमाची माहिती दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, तसेच प्रधान सचिव विकास खारगे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here