इचलकरंजी (महाराष्ट्र सह संपादक मनोज सोनवले): पृथ्वीवरील प्रदुषणास प्लास्टिकच्या अतिवापर हेच कारणीभूत आहे. तो टाळण्यासाठी पृथ्वीला वाचविण्यास दिलेला संदेश अत्यंत गरजेचा आहे. पृथ्वीला प्लास्टिकमुक्त करण्यासाठी माई बाल विद्या मंदिरातील शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी राबविलेला प्लास्टिक संकलाचा उपक्रम आदर्शवत आहे. या माध्यमातून आपली पृथ्वी प्लास्टिक व प्रदुषण मुक्त बनविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करुया, असे आवाहन नगराध्यक्षा अॅड. सौ. अलका स्वामी यांनी केले.
येथील माई बाल विद्या मंदिरातील शिक्षक-विद्यार्थी-पालक यांनी देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत प्लास्टिकमुक्त वसुंधरा असा संदेश दिला आहे. या उपक्रमासाठी शाळेच्यावतीने करण्यात आलेल्या आवाहनास विद्यार्थी व पालकांचा उदंड प्रतिसाद लाभला. शाळेतील कलाशिक्षिका शर्मिष्ठा फाटक यांच्या संकल्पनेतून प्लास्टिकच्या विळख्यात वसुंधरा या विषयाला अनुसरून मांडणी करण्यात आली आहे. त्यातून बाटल्या आणि रांगोळीच्या सहाय्याने 10 फूट आकाराचा मासा पृथ्वीला गिळंकृत करत असल्याची प्रतिकृती साकारली आहे. या उपक्रमास नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी यांनी भेट देऊन माहिती घेत या उपक्रमाचे कौतुक केले.

याप्रसंगी नगरसेवक सागर चाळके, शिक्षण सभापती मनोज साळुंखे, आरोग्य सभापती संजय केंगार, पाणी पुरवठा सभापती दीपक सुर्वे, आरोग्याधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार, संस्थेच्या अध्यक्षा निर्मला ऐतवडे, उपाध्यक्षा माधुरी मर्दा, मुख्याध्यापिका शैला कांबरे, पर्यावरण प्रेमी डॉ. ज्योती बडे, स्मिता चौगुले, निकिता शहा, डॉ. मर्दा, डॉ. चौगुले, स्वच्छता निरिक्षक विजय पाटील, शाळेतील सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.






