तिरुवनंतपुरम : केरळमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केरळ सरकारने रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सलग चौथ्या दिवशी केरळमध्ये ३० हजारापेक्षा अधिक कोरोना रुग्ण सापडले आहेत. या रात्रीच्या संचारबंदीला सोमवारपासून सुरूवात होणार आहे, असे मुख्यमंत्री पिनारयी विजयन यांनी जाहीर केले आहे. रात्री १० वाजल्यापासून पहाटे ६ वाजेपर्यंत ही संचारबंदी लागू असणार आहे.
केरळमध्ये आज १,६७,४९७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३१,२६५ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर राज्यभरात १५३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे केरळमधील कोरोना रुग्णांची एकण संख्या ३९,७७,५७२ इतकी झाली आहे.
राज्यातील परिस्थितीचा आणि विषाणूचा आलेख नियंत्रित राखण्यासाठी उचललेल्या पावलांचा केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी गुरुवारी उच्च अधिकाऱ्यांसह आढावा घेतला. देशातील १ लाखापेक्षा अधिक सक्रिय रुग्ण असलेले केरळ हे एकमेव राज्य आहे. तर १० हजारापासून १ लाखापर्यंत सक्रिय रुग्ण असलेली ४ राज्ये आहेत. उर्वरित ३१ राज्यांमध्ये १० हजारांपेक्षा कमी सक्रिय रुग्णसंख्या आहे.






