मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : ज्येष्ठ पत्रकार, नाटककार, लेखक जयंत पवार यांचे निधन. पवार यांना रात्री अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
जयंत पवार यांना शनिवारी रात्री दोनच्या सुमारास अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी पत्रकार, लेखिका संध्या नरे व मुलगी असा परिवार आहे.
नाटककार आणि लेखक अशी अवीट छाप जयंत यांनी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर पाडली होती. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेनं घेतलेल्या स्पर्धेत ‘काय डेंजर वारा सुटलाय’ या नाटकासाठी जयंत पवार यांना सर्वोत्कृष्ट लेखनाचे प्रथम पारितोषिक मिळाले होते. २०१४च्या जानेवारी महिन्यात महाड येथे झालेल्या १५ व्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद जयंत पवार यांनी भूषवले होते. ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ या कथासंग्रहासाठी २०१२ चा साहित्य अकादमी पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते.






