मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : मुंबईत गणेशोत्सवादरम्यान कडक निर्बंध लागू करण्यात आलं आहे. राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध जारी केले आहेत. तर आता मुंबई पोलिसांकडूनही मुंबईत गणेशोत्सव काळात होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
मुंबईत १० सप्टेंबरपासून पुढील ९ दिवस जमावबंदी लागू करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी ५ पेक्षा अधिक जणांनी गर्दी केल्यास कारवाई करण्यात येणार आहे. तसेच ९ दिवस १४४ कलम लागू असेल गणेशोत्सव काळात कोणत्याही मिरवणुकांना परवानगी नसेल, गणेश भक्तांनी ऑनलाईन माध्यमातून दर्शन घ्यावे असे मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या सूचनेत म्हटलं आहे. गणेशोत्सवादरम्यान सार्वजनिक गणेश मंडळांचे दर्शन नागरिकांसाठी बंद राहणार आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव आणि कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गणेशोत्सवावर निर्बंध लावले आहेत. राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंधांसह मुंबई पोलिसांनीही नागरिकांना आवाहन केलं आहे. मुंबईतील कोरोना परिस्थिती स्थिर असल्यामुळे पुन्हा गर्दीमुळे कोरोनाचा विस्फोट होऊ नये यासाठी राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांकडून उपाययोजना करण्यात येत आहे. मुखदर्शन अथवा प्रत्यक्ष मंडपात येऊन दर्शन घेण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे.






